स्वामींनी दासबोध ग्रंथात मूर्खांचे व पढतमूर्खांचे अनेक नमुने दाखवून शहाण्या माणसाने त्या मूर्ख लक्षणांचा जाणीवपूर्वक त्याग करावा, असे सांगितले आहे. सद्विधा निरूपण व इतर अनेक समासांतून विवेकाचे महत्त्व सांगून समाजातील शहाण्या माणसाच्या अंगी कोणते गुण असावेत, हे स्पष्ट केले आहे. स्वराज्याला अनुकूल असा आदर्श बलशाली, चारित्र्यसंपन्न माणूस घडवण्याचे कार्य स्वामींनी आरंभले होते. महंतांद्वारा सार्या हिंदुस्थानभर लोकोद्धाराचे प्रचंड कार्य करून म्लेंच्छांची सत्ता उलटवून ‘उदंड जाहले पाणी । स्नानसंध्या करावया ॥’ असे सुराज्य जिकडे तिकडे करावे, अशी त्यांनी मनिषा होती. स्वामींच्या ठिकाणी प्रचंड उत्साह होता. ते अत्यंत साक्षेपी होते. आळसाचा त्यांना तिटकारा होता. ते संतप्रवृत्तीचे होते. डोंगरदर्यात एकांतात राहणे त्यांना आवडे. पण, तरीही लोकोद्धाराची तळमळ त्यांच्या ठायी होती. लोकसंग्रहाची त्यांना आवड होती. धर्माच्या सात्त्विक पातळीवर त्यांना सज्जनांची संघटना उभारायची होती. समर्थांच्या आयुष्याचा आलेख हा प्रचंड उद्योगाचा आणि चढत्या यशाचा होता. ते दृढसंकल्पवादी, साक्षेपी व विवेकी असल्याने यश त्यांच्यासमोर हात जोडून उभे असे. त्यांनी प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. नि:स्पृह महंत तयार करून हिंदुस्थानात ठिकठिकाणी आपल्या कार्यासाठी पाठवून दिले. एवढा प्रचंड व्याप सांभाळत असूनही त्यांना आपल्या कार्याचा, आपल्या ज्ञानाचा यत्किंचितही गर्व नव्हता. उच्च आध्यात्मिक विचारांचा तसेच प्रापंचिकांनाही मार्गदर्शन करणारा दासबोधासारखा ग्रंथ लिहून झाल्यावर त्याचे कर्तृत्व ते स्वतःकडे घेत नाहीत. ‘हे सर्व जगदिशाने केले’ असे सांगून ग्रंथाचे संपूर्ण श्रेय ते भगवंताला देतात.
सकळ करणे जगदिशाचें ।
आणि कवित्वचि काय मानुष्याचें ।
ऐशा अप्रमाण बोलण्याचें ।
काय घ्यावें ॥ (दा. २०.१०.३५)
सतराव्या शतकात सर्व क्षेत्रात जी क्रांती घडून आली, त्यात समर्थांचा सहभाग लक्षणीय होता, हे कुणी नाकारू शकत नाही. कुठल्याही क्रांतीसाठी समाज संघटित करावा लागतो. एका ध्येयाने प्रेरित होणारे समाजघटना एकत्र बांधण्याचे कार्य आपण समजतो, तेवढे सोपे नाही. शिवाय त्या संघटनेची उभारणी चारित्र्यमूल्यांसह व नीतिमूल्यांवर करून संघटन अबाधित राखणे व त्याचा उपयोग लोकांच्या उद्धारासाठी करणे, असे भव्य ध्येय साकार करण्यासाठी समर्थ झटत होते. हिंदुस्थानभर शेकडो मठांची स्थापना करून स्वामींनी आपल्या कार्याची पूर्वतयारी करून ठेवली होती. समर्थांच्या या खर्या सामाजिक कार्याची जाणीव थोड्याच समर्थशिष्यांना आहे. पूर्वीच्या आचार्यांनी अनेक वर्षे निवृत्तीमार्गाचा उपदेश करून संसारविमुखता समाजाच्या हाडीमासी मुरवली होती. परमार्थ मार्गातले ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे तत्त्वज्ञान परमार्थात उन्नती करण्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे असेलही; परंतु ते तत्त्वज्ञान प्रपंचात ऐहिकात शिरल्यामुळे राजकीय आकांक्षा बोथट होत गेल्या. आपला मित्र कोण, आपला शत्रू कोण ही ओळखच नाहीशी व्हायची वेळ आली. पाणी जसे सज्जन, दुर्जन, कपटी, हिंस्र अशा सर्व प्राण्यांची तहान भागवते, वृक्ष जसा त्याच्या फांद्या छाटणार्यालाही मधुर फळे खाऊ घालतो, दमलेल्या सर्व श्रान्तांना सावली देतो. त्यात आपपर भाव असत नाही. असे आपण वागावे. संसार करणे हे पाप आहे, अशी ही समाजात रुजलेली विचारसरणी नष्ट करून ऐहिक आकांक्षा, स्वराज्य साम्राज्य, राष्ट्राची उभारणी, राष्ट्रहिताची जाणीव, लोकोद्धाराची तळमळ, त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी, हे प्रपंच विज्ञान लोकांना सांगायचे होते. समर्थांनी प्रपंचाची महती सांगितली. प्रपंच बुडाला तर परमार्थही बुडेल असे पटवून दिले. लोकांना दुबळे करेल, असे तत्त्वज्ञान बाजूला सारून त्यांना धनुर्धारी राम आणि इकडचा पर्वत तिकडे नेण्याचे सामर्थ्य असणार्या स्वामिनिष्ठ हनुमानाची उपासना सांगितली. दैववादाने दुबळ्या झालेल्या समाजाला त्यांनी ‘यत्न तो देव जाणावा’ ही नवी विचारसरणी दिली.
(क्रमश:)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat