नवी दिल्ली : विश्वचषक सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यांमध्ये भारतचे पारडे जड पहिल्या डावापासूनच जड होते. प्रथम फलंदाजी करताना भारतने ३५२ धावांचा रतीब घातला. यामध्ये शिखर धवनच्या शतकासहित रोहित शर्मा, विराट कोहलीच्या अर्धशतकांचा समावेश आहे. ३५३ धावांचा सामना करताना ऑस्ट्रेलियानेदेखील कडवी झुंज दिली. परंतु, त्यांना ५० षटकांमध्ये ३१६ धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारूंना विजय साजरा करता आला नाही. बुमराहने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या तर चहलने आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. अलेक्स कॅरी, वॉर्नर आणि स्मिथ यांची अर्धशतकी खेळी वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवीर धवन आणि रोहित शर्माने सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी १२७ धावांची खेळी केली. रोहित शर्मा ५७ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीनेदेखील धवनसोबत चांगली भागीदारीकरून भारताला मजबूत स्थितीत आणले. धवन ११७ धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर कोहलीने ८२ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. तर. महेंद्र सिंग धोनी आणि हार्दिक पंड्याने अनुक्रमे ४८ आणि २७ धावा करून भारताला ३५२ धावांचा डोंगर उभा केला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat