आगरताळा : देशात २०४७ पर्यंत भाजपचे सरकार राहील, असा विश्वास भाजपचे महासचिव राम माधव यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीत त्रिपुरा राज्यातील त्रिपुरा पूर्व व त्रिपुरा पश्चिम या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यानिमित्ताने आगरताळा येथे ‘विजया अभिनंदन रॅली’ आयोजित केली होती. याच कार्यक्रमात त्यांनी मोदी काँग्रेसचा विक्रम तोडणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राम माधव म्हणाले, १९५० ते १९७७ पर्यंत काँग्रेसने देशावर सत्ता केली. त्यामुळे देशावर जर सर्वाधिक काळ कोणी सत्ता केली असेल तर तो काँग्रेस आहे. काँग्रेसचा हा विक्रम मोडण्याची ताकत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातच आहे. त्यामुळे देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या १०० वर्षापर्यंत म्हणजेच २०४७ सालापर्यंत भाजपच सत्तेवर राहणार आहे.
राम माधव यांच्यासह या कार्यक्रमात त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव, भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजय राहटकर तसेच आदी नेते उपस्थित होते. आपण पुन्हा एकदा लोकसभा जिंकलो. मात्र हा विजय म्हणजे पूर्णविराम नाही. ही तर सुरुवात आहे, आपल्याला अजून लांबचा पल्ला गाठायचा असल्याचे, यावेळी विजया राहटकर म्हणाल्या.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat