नवी दिल्ली : माजी केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली आपला सरकारी बंगला सोडणार आहेत. नुकत्याच स्थापन झालेल्या मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात जेटलींनी आजारपणामुळे सामील होण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता ते सध्या वास्तवास असलेल्या सरकारी बंगला खाली करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी बंगला सोडण्याआधी त्यांनी सरकारी वाहने परत केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, लोकसभेचा कार्यकाल संपल्यानंतर एका महिन्याच्या आतमध्ये खासदारांचे वास्तव असलेला सरकारी बंगला सोडणे बंधनकारक असते. आजारपणाचा सामना करत असतानाही जेटली यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सरकारी बंगला खाली करणार आहेत. एवढंच नाही तर, त्यांच्या सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या व सुरक्षा व्यवस्थादेखील त्यांनी कमी केली आहे.
सरकारी बंगला सोडल्यानंतर जेटली दक्षिण दिल्लीमधील आपल्या घरी राहायला जाणार आहेत. बंगला सोडण्याआधी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाणी, वीज आणि टेलिफोनची थकीत देयके भरण्याच्या सूचना केल्या असून दररोज येणारी २५ वर्तमानपत्रेदेखील त्यांनी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, जेटली यांच्या निर्णयाचे सर्वच स्थरातून स्वागत करण्यात येत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat