हैदराबाद : देशभरात काँग्रेसच्या नेत्यांचे, पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र सुरु असतानाच दक्षिणेतील तेलंगणमध्येही काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. कारण, काँग्रेसच्या तब्बल १२ आमदारांनी तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) मध्ये प्रवेश करणार असल्याचे पत्र विधानसभा अध्यक्षांना सुपूर्द केले आहे.
महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, या आमदारांचे सदस्यत्व काँग्रेसला रद्द करता येणार नाही. कारण, दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षबदल केल्यास पक्षबदल विरोधी कायदा लागू होत नाही. तेलंगण विधानसभेचा कार्यकाल संपण्यापूर्वीच के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा विसर्जित करुन मुदतपूर्व निवडणुकीचा घाट घातला होता. त्याचे त्यांना अपेक्षित फळही मिळाले आणि ११९ पैकी ८८ जागांवर त्यांनी घवघवीत विजय संपादित केला. बहुमताचे सरकार स्थापन करुन राव मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करत १२ काँग्रेस आमदारांनी टीआरएसचा मार्ग स्वीकारला आहे. आहे. टीआरएसमधून फुटून काँग्रेसमध्ये आलेल्या आमदार रोहित रेड्डींचाही या नाराज आमदारांमध्ये समावेश आहे. ते पुन्हा टीआरएसच्या वाटेवर आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat