दिल्ली, ओडिसा, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यातील मुख्यमंत्र्यांना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजनेत सहभागी व्हावे असा आग्रह केला आहे. हे योजना राबवण्यासाठी लागणाऱ्या सोयी आणि सुविधा संबंधित राज्यांना पुरवल्या जातील अशी माहिती देखील आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.
दरम्यान ही योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावी यासाठी डॉ. हर्षवर्धन यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी देखील चर्चा केली. ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या योजनेमध्ये आपला सहभाग या आधीच दर्शवला असून या योजनेचा लाभ करोडो नागरिकांना झाला असल्याचे देखील सांगितले आहे. डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, ते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी देखील बोलतील. आयुषमान भारतसारख्या योजनेचे फायदे देशातील सर्व वंचित आणि संवेदनशील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
केंद्र सरकारच्या पुढाकाराने दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत, गरीब आणि दुर्बल विभागातील १०.७ कोटी कुटुंबांना उपचारांसाठी दरवर्षी पाच लाख रुपयांचा निधी या योजनेमार्फत दिला जातो.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat