मुंबई : बहिष्काराचे अस्त्र वापरून फुटीरतावाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळता येतील, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी नुकतेच केले. दादरमधील सावरकर स्मारक परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, "बहिष्काराचे अस्त्र वापरून फुटीरतावाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळता येतील, त्यासाठी फक्त ५ वर्ष अमरनाथ यात्रेवर आणि पर्यटनासाठी काश्मीर खोऱ्यावर सर्वांनी बहिष्कार घालावा, अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आपल्या सैन्यावर होणारा खर्च तर यामुळे वाचेलच पण या यात्रेतून वर्षभराची कमाई करणाऱ्या फुटीरतावाद्यांची रसदही तुटेल. काही ठराविक लोकांनी तिथे जाऊन पूजाअर्चा जरूर करावी आणि काश्मीर खोऱ्यातील पर्यटन क्षेत्रांऐवजी जम्मू, लडाखमधील पर्यटन स्थळांची निवड करावी” असे ते यावेळी म्हणाले.
एका वृत्तवाहिनीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणारे दोन कार्यक्रम सादर केल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन उभे राहिले. त्यांच्या कार्यालयावर महामोर्चा धडकणार होता. पण त्यांनी माफी मागितल्यामुळे आणि समाज माध्यमांवरून त्या कार्यक्रमांच्या क्लिप्स काढल्यामुळे हा विजय साजरा करण्यासाठी मोर्चाचे रूपांतर विजयी मेळाव्यात करण्यात आले. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सावरकरांच्या सन्मानासाठी आयोजित या मेळाव्याला सत्यशीलराजे दाभाडे, सिद्धार्थराजे कंक, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार भारतकुमार राऊत, भाजपा प्रवक्त्या श्वेता परुळकर, समीर गुरव, शिवराज्याभिषेक दिनोत्सवसमिती, किल्ले रायगडचे सुनील पवार, मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते विष्णु काळडोके, स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, कार्यवाह राजेंद्र वराडकर, राष्ट्रभक्त प्रतिष्ठानचे विकास देशपांडे तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले अनेक संस्था, संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
वृत्तीविरोधात लढाई
ही लढाई फक्त एका प्रसारमाध्यमाच्या विरोधात नव्हती तर ती होती त्या वृत्ती विरोधात. ती जिंकली आता पुढे काय? यापुढे नव्या माध्यमाचा वापर करत काश्मीर प्रश्नी जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार करायचा आहे, असा निर्धार स्मारकाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat