पुणे : गोवा मुक्तीसंग्रामाचे अग्रणी सशस्त्र क्रांतिकारक पद्मश्री मोहन रानडे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोव्याला मुक्त करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. गोवा मुक्तिसंग्रमातील आझाद गोमंतक दलाचे नेते व संघाचे स्वयंसेवक अशी त्यांची ओळख होती. आज दुपारी ४ वाजता पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रानडे यांना 'गोव्याचे सावरकर' म्हणून ओळखले जायचे. बेती पोलिस चौकीवरील त्यांचा गाजलेला धाडसी हल्ला खूप प्रेरणादायी होता. रानडे यांनी पोर्तुगालामधी लिस्बनच्या तुरुंगात १४ वर्षे तुरुंगवास भोगला होता. १९६९ मध्ये त्यांची सुटका झाली. रानडे यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा सरकारच्या ‘गोवा पुरस्कार’ तसेच केंद्र सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्कराने त्यांना गौरवण्यात आले होते. गोवा मुक्तिसंग्रामातील अनुभवांवर ‘सतीचे वाण’ हे आत्मचरित्र व ‘स्ट्रगल अनफिनिश्ड’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat