उज्जैन : नर्मदा नदीचे पाणी शिप्रा नदीत सोडून नदी जोड प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. सहा पाईपांद्वारे नर्मदा नदीतील पाणी शिप्रा नदीजवळील त्रिवेणी घाटात सोडण्यात आले. नर्मदा-शिप्रा नदीच्या पाण्याचे एकत्रीकरण हा नदी जोड प्रकल्पाचा महत्वाचा भाग होता. यामुळे उज्जैन व इंदोर जिल्ह्यातील जलसंकट दूर होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची यशस्वी चाचणी झाल्याने उज्जैन व इंदोर वासियांना दिलासा मिळाला आहे.
२०१८ मध्ये ६८ किमी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. नर्मदा शिप्रा लिंकद्वारे उज्जैनच्या त्रिवेणी संगमपर्यंत १३२५ एमएम आकाराची ही पाईपलाईन करण्यात आली असून यासाठी १३८ कोटी रुपयांचा खर्च आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पामुळे १३०० एमएलडी पाणी इंदूर आणि उज्जैन जिल्ह्यातील शेकडो गावांना पुरवण्यात येणार आहे. तर शेतीसाठीही हजारो हेक्टर पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, या पाईपलाईनद्वारे एका नदीतून दुसऱ्या नदीत एका मिनिटाला १.२० लाख लिटर पाणी सोडण्यात येत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat