नागपूर : "निवडणुकीत स्पर्धा असते आणि त्यात आरोप-प्रत्यारोप होणारच. पण, निवडणूक संपल्यानंतर हे सर्व थांबायला हवे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे?, असा सवाल करीत लोकशाहीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, हे राज्यप्रमुखाचे कर्तव्य असते. या कर्तव्याला चुकला त्याला राजा म्हणायचे?," या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कुणाचेही नाव न घेता सुनावले.
रा. स्व. संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा समारोप रविवारी रेशीमबाग मैदानावर झाला. याप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया तसेच वर्गाचे सर्वाधिकारी प्रा. अनिरुद्ध देशपांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, "लोकसभा निवडणूक नुकतीच आटोपली. निवडणुकीत स्पर्धा होतेच. लोकशाही आहे, काही पक्ष जिंकतात तर काही पक्ष हरतात. स्पर्धा असल्याने अनेक गोष्टी घडतात. वातावरणात खळबळ असते. विक्षेपही असतो. कुणी जिंकतो तर कुणी हरतो. त्यामुळे निवडणूक संपल्यानंतर आरोप-प्रत्यारोप संपून, असूया संपून सर्वांनी एकदिलाने काम करायला हवे व हेच देशहिताचे आहे."
"होळीच्या दिवशी अभद्र बोलणे आता कमी होत आहे. पण, ‘...कवित्व संपत नाही’ या मराठी म्हणीप्रमाणे निवडणुकीचे कवित्व संपलेले नाही. निवडणुकीत चढलेले भूत अद्याप उतरलेले नाही, असे व्हायला नको. निवडणूक संपली, विरोध संपला. देश सर्वकाळ एक आहे. भडास काढायची तरी किती? त्याला मर्यादा हवी. त्यामुळे देशाचे नुकसानच होते. बंगालमध्ये तरी काय सुरू आहे? देशाच्या इतर भागांत असे काही होत आहे का? शासन-प्रशासनाने बंदोबस्त करायला हवा. सामान्य नागरिक नासमज असू शकतो. पण, राज्यप्रमुखाचे हे कर्तव्य आहे की कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायला हवी. या कर्तव्याला चुकला त्याला राजा म्हणायचे?," असा सवाल त्यांनी केला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat