मुंबई : सप्टेंबर २०१८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून ‘भारत का भविष्य’ या विषयावर नवी दिल्लीत तीन दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांनी या कार्यक्रमांवर भाष्य करताना असत्य मजकूर छापण्याचा खोडसाळपणा केला होता. ‘लोकसत्ता’च्या अग्रलेखात दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजी (अखलाख प्रकरणी) " ‘गोमातेची हत्या करणाऱ्या पाप्यास वेदांमध्ये देहान्त प्रायश्चित्त दिले जाते’, इतकेच विधान त्या भयानक घटनेनंतर तीनच दिवसांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सरसंघचालकांनी केले होते", असे वाक्य लिहिले होते. तर ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्रात करण थापर ह्या पत्रकाराने ‘Has the RSS ground shifted?’ या शीर्षकाखालील आपल्या लेखात तेच वाक्य सरसंघचालकांच्या तोंडी घातले होते. वस्तुतः रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी असे विधान आजवर कधीही केलेले नाही. कोणत्याही स्वरूपाचा हिंसाचार हा चुकीचाच आहे, असे स्पष्ट मत मोहनजी भागवत यांनी दिल्लीत व्यक्त केले होते.
डोंबिवलीचे रहिवासी अक्षय फाटक यांनी ह्या विरोधात ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’कडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींनतर प्रेस कौन्सिलने ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ ह्या वृत्तपत्रांना २६ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविली होती. त्या दरम्यान ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ ह्या वृत्तपत्रांनी याबाबत आपला खुलासा छापला. मात्र, त्यात 'पांचजन्य' हे संघाचे मुखपत्र असल्याचा उल्लेख केला होता. वस्तुतः ‘पांचजन्य’ स्वतंत्र नियतकालिक असून ते संघाचे मुखपत्र नाही. सदर प्रकरणी २९ मार्च २०१९ रोजी अंतिम सुनावणी झाली. ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’कडून अक्षय फाटक यांच्या तक्रारदार म्हणून अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पण "अक्षय फाटक हे वाचक आहेत आणि वाचकाकडे वृत्तपत्रातील चुकीच्या तपशीलाबद्दल तक्रार करण्याचे अधिकार आहेत", असा स्पष्ट निर्वाळा प्रेस कौन्सिलकडून देण्यात आला.
प्रेस कौन्सिलने या संदर्भातील आपल्या निर्णयात म्हटले आहे की, अशी चूक एखाद्या नवोदित पत्रकाराकडून घडल्यास त्याकडे अनवधानाने झालेली चूक म्हणून पाहता येऊ शकेल. मात्र प्रत्यक्ष संपादकानेच चुकीचे विधान अग्रलेखात केलेले असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. संबंधित प्रकरणात ‘इंडियन एक्स्प्रेस’आणि ‘लोकसत्ता’च्या संपादकीय विभागास ह्या चुकीसाठी जबाबदार धरले असून दोन्ही वृत्तपत्रांच्या विरोधात कारवाईचे आदेश प्रेस कौन्सिलने दिले आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये करण थापर यांनी लिहिलेल्या लेखासंदर्भात भाष्य करताना प्रेस कौन्सिलने म्हटले आहे की, एखाद्या नवोदित पत्रकाराच्या चुकीकडे अनवधानाने केलेली चूक म्हणून पाहता येईल. पण, करण थापर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी स्तंभलेखकाकडून अशा प्रकारचे लिखाण अपेक्षित नव्हते. त्यांच्या या चुकीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
‘पांचजन्य’मध्ये छापून आलेल्या मजकुरास सरसंघचालकांचे मत म्हणून गृहीत धरले जाऊ शकत नाही, असेही प्रेस कौन्सिलने स्पष्टपणे नमूद केले आहे. एका मोठ्या संघटनेच्या प्रमुखांच्या नावे एखादे वाक्य/ विधान छापण्यापूर्वी त्याबाबत सत्यासत्यतेची पडताळणी व्हायला हवी, असेही प्रेस कौन्सिलने म्हटले आहे. ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्रांनी चुकीचे भाष्य केल्याबद्दल ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’ने या दोन्ही वृत्तपत्रांवर ठपका ठेवला आहे. या संदर्भातील प्रेस कौन्सिलचे आदेश दि. २९ मे २०१९ रोजी काढण्यात आले असून ते प्रेस कौन्सिलच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. हे आदेश पुढील कारवाईसाठी डीएव्हीपी, महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलीस उपायुक्त यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी संबंधित शासकीय विभागांकडून या दोन्ही वृत्तपत्रांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat