नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमई क्षेत्रात सातशे समुह स्थापन करण्याच्या योजनेची घोषणा केली. त्यासह एमएसएमई क्षेत्रात औद्योगिक आणि खासगी क्षेत्रातील भागिदारीचीही माहीती दिली. या समुहांच्या स्थापनेसाठी उद्योग क्षेत्रातील नियमावली शिथील करण्याबद्दलचे संकेतही त्यांनी दिले. नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय उद्योग संघाच्या (सीआईआई) राष्ट्रीय परिषदेला त्यांनी संबोधित केले.
गडकरी म्हणाले, "औद्योगिक क्षेत्र आणि सरकारमध्ये विश्वास आहे. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे अडचणी येत आहेत. केंद्र सरकार उद्योगांच्या विस्तारासाठी पूर्णपणे सहकार्य करत आहे. उद्योगांमुळे निर्यात, विकास आणि रोजगार वृद्धीसाठी मदत होईल. त्यासाठी खासगी क्षेत्राने आमच्यासोबत येण्याची गरज आहे. केवळ अगरबत्ती उद्योग हा ४ हजार कोटींचा आहे. अन्य विविध सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्राचाही मोठा हिस्सा आहे. याचा फायदा कृषि आणि अन्य क्षेत्रांनाही होईल."
"केंद्र सरकार नव्या योजनांद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रशिक्षण केंद्रांचीही स्थापना केली जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रांनी याला हातभार लावल्यास त्याला गती येईल. केंद्र सरकाने अशा प्रशिक्षण केंद्राद्वारे कुशल कामगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतात पूर्वीपासून सुरू असलेल्या पारंपारीक उद्योगांचा विस्तार करण्यासाठी विशेष लक्ष देणार आहे. पारंपारिक व्यावसाय वृद्धी व्हावी यासाठी सरकार विशेष योजना आखत आहे. कौशल्य विकास केंद्रांतून कुशल कारागीर घडावेत, हे सरकारचे लक्ष्य असणार आहे.", अशी माहीती त्यांनी यावेळी दिली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat