पुरोगाम्यांतली स्मशानशांतता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2019
Total Views |


 


नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी लोकशाही, संविधान धोक्यात येईलच्या हाकाट्या पिटणाऱ्यांना प्रत्यक्षात बंगालमध्ये लोकशाहीद्रोही ममतांच्या गुंडांनी घातलेला हैदोस दिसला नाही. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांना ममता बॅनर्जींसारखे आक्रस्ताळे व्यक्तिमत्त्व एकूणच लोकशाही व्यवस्थेलाच सुरुंग लावण्याचे प्रतिगामी काम करत असल्याचे समजले नाही. असे का?


लोकशाहीचा जन्म होण्याआधी देशोदेशीचे राजे-राजवाडे, सरंजामदार-वतनदार आपापले राज्य टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी युद्धाचा मार्ग अवलंबत. शस्त्रांच्या खणखणाटातून अन् रणभूमीवरच्या वार-प्रतिवारातून एकमेकांना संपवण्यासाठी दोन्ही बाजूंचे शिपाई त्वेषाने लढत असत. पुढे जगात लोकांनी लोकांसाठी चालवलेल्या शासनपद्धतीचा म्हणजेच लोकशाहीचा उदय झाला. त्याचा भारतानेही स्वीकार केला आणि हा परस्परांचा जीव घेण्याचा प्रकार मागे पडला. मतदानाच्या माध्यमातून लोक आपले प्रतिनिधी निवडू लागले आणि प्रतिनिधीही देश वा राज्यकारभार हाकू लागले. परंतु, पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती पाहता, ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेस काळाची चक्रे उलट्या दिशेने फिरवत लोकशाहीचाच गळा घोटत असल्याचे स्पष्ट होते. मोठ्या हिकमतीने डाव्या आघाडीच्या वर्षानुवर्षे चाललेल्या घातक सत्तेला खाली खेचून बंगाल काबीज केलेल्या ममतांना आता राज्य हातातून निसटत चालल्याच्या भयाने ग्रासल्याचे त्यांच्या एकूणच वर्तणुकीतून दिसते. शनिवारी रात्री भाजपच्या पाच कार्यकर्त्यांची तृणमूलच्या गुंडांनी केलेली निर्घृण हत्या ममतांच्या याच भयगंडाचा परिपाक!

 

‘करो या मरो’च्या ईर्ष्येने मैदानात उतरलेल्या ममता आणि तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालला स्वतःची जहागिरी समजतात. भाजपने गेल्या काही काळापासून राज्यात मारलेली मुसंडी ममतांना रुचलेली नाही. तृणमूलच्या कार्यकर्ते-नेत्यांनाही दीदींची सत्ता गेली तर आपले आणि आपल्या बऱ्यावाईट धंद्याचे काय होईल, याने पछाडले आहे. परिणामी, ही सगळीच सत्तेसाठी-अधिकारांसाठी आणि त्यातून मिळणाऱ्या लाभासाठी हपापलेली माणसे पार बावचळून गेली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवरच हल्ले करू लागली. तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केवळ भाजप कार्यकर्ते वा तालुका-जिल्हा-राज्य पातळीवरील नेते-पदाधिकारीच नव्हे तर भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावरही हल्ला केला. समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करत त्याचा आळ मात्र भाजपवर ढकलला. ममता बॅनर्जींनी तर थेट भाजप कार्यालयाचा ताबा घेत तिथे तृणमूल काँग्रेसचे चिन्हही रंगवले. ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देणार, ठोकून काढणार, तुरुंगात धाडणार, असेही ममता बरळू लागल्या. ही सगळीच लक्षणे अराजकाची, पण पश्चिम बंगालमध्ये इतके काही घडूनही उठसूट लोकशाहीच्या, संविधानाच्या नावाने गळे काढणाऱ्यांच्या तोंडातून एक शब्दही फुटला नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी लोकशाही, संविधान धोक्यात येईलच्या हाकाट्या पिटणाऱ्यांना प्रत्यक्षात पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीद्रोही ममतांच्या, तृणमूलच्या गुंडांनी घातलेला हैदोस दिसला नाही. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांना ममता बॅनर्जींसारखे आक्रस्ताळे व्यक्तिमत्त्व एकूणच लोकशाही व्यवस्थेलाच सुरुंग लावण्याचे प्रतिगामी काम करत असल्याचे समजले नाही. असे का?

 

आपल्या वर्तुळाच्या बाहेर जो असेल, त्याच्या कुसळाएवढ्या चुकांविरोधात आकांडतांडव करणे आणि आपल्या वर्तुळात असलेल्यांच्या मुसळाएवढ्या चुकाच नव्हे तर गंभीर गुन्ह्यांविरोधातही स्मशानशांतता बाळगणे, ही अशा कथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, बुद्धीजीवी, संविधानप्रेमी, लोकशाहीवादी वगैरे म्हणवल्या जाणाऱ्यांची प्रवृत्ती असते. ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेस वा या विचारसरणीच्या लोकांना, गटांना, संघटनांना, पक्षांना ही सगळीच मंडळी आपल्या गोटातले मानतात. परिणामी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या पाच कार्यकर्त्यांची एकाच दिवशी केलेली हत्या असो वा याआधीही कित्येक कार्यकर्त्यांची केलेली हत्या असो या मंडळींना दखल घेण्याजोगी घटना वाटत नाही. भाजप वा राष्ट्रवादी-हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जाणारा बळी अशा लोकांसाठी किरकोळ असतो, पण तुकडे तुकडे गँगविरोधात कायदेशीररित्या कारवाई केली, याकूब मेमनसारख्या दहशतवाद्याला फाशीची शिक्षा झाली, तरी ही माणसे छाती पिटायला तयार असतात. म्हणजेच जे जे देशविरोधी, देशविघातक ते ते प्रिय आणि जे जे देशहितकारक, ते ते अप्रिय अशी या लोकांची मानसिकता असते. भाजप वा राष्ट्रवादी शक्तींविरोधात कोणत्याही थराला जाण्याला या लोकांची संमती असते.म्हणूनच पश्चिम बंगालमध्ये जे काही सुरु आहे, त्या गैरकृत्याचे वाटेकरी ही मंडळीही ठरतात. आणि ही आताचीच गोष्ट नाही, तर पश्चिम बंगालात डाव्यांची सत्ता होती तेव्हाही हा वर्ग असाच शांत होता. डाव्यांनी केलेल्या हिंसाचाराला, विरोधकांचे मुडदे पाडण्याला या लोकांनी कित्येकदा जस्टीफाय (समर्थन) करण्याचेही काम केले होते. परंतु, हे कुठवर चालणार?

 

सिंगूर आंदोलनातून गरिबांचा आवाज म्हणून सामान्यांत लोकप्रिय झालेल्या ममता आणि त्यांचा पक्ष आता गुंडांचा पक्ष झाला आहे. गेल्या नऊ-दहा वर्षांतल्या त्यांच्या शासनात ममतांनी पश्चिम बंगाल बांगलादेशी, रोहिंग्या आणि ठिकठिकाणच्या मुस्लिमांना आंदण म्हणून दिला. ज्या मातीतून स्वातंत्र्यपूर्व काळात ‘वंदे मातरम’ स्फुरले, त्याच बंगालचे अंगण देशाबाहेरच्या लोकांना देताना ममतांना वावगे वाटले नाही. बंगालची सांस्कृतिक ओळख असलेल्या दुर्गाविसर्जनात अडथळे आणताना, सरस्वती वंदनेवर निर्बंध आणतानाही ममतांना सर्वसामान्यांच्या भावभावनांची काळजी वाटली नाही. केवळ मुस्लिमांच्या एकगठ्या मतांसाठी आणि आपल्या डोक्यावरील मुख्यमंत्रिपदाचा ताज कायम राहावा, यासाठीच ममतांनी हे सगळे कारनामे केले. पण आता मात्र पश्चिम बंगालची जनता जागृत झाली, तिच्यात तेच स्वातंत्र्यपूर्व काळातले भारतमातेशी, इथल्या संस्कृतीशी इमान राखण्याचे स्फुरण चढले. सोबतच ममतांच्या भ्रष्टाचाराभिमुख आणि विकासापासून दुरावलेल्या राजवटीची जनतेला चीड येऊ लागली, ही सत्ता कधी एकदा उलथवतो असे तिला झाले. लोकसभा निवडणुका असो वा त्याआधीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यातून इथल्या जनतेने ममतांविरोधात ‘छोडो बांगला’चा नारा दिला. यातूनच आगामी विधानसभा निवडणुकांत आपला सुपडा साफ होईल, याची जाणीव ममतांना झाली. म्हणूनच आता हिंसेच्या, मनगटशाहीच्या बळावर भाजपला रोखण्याचे उद्योग त्या करत असल्याचे दिसते. शिवाय ममतांनी कितीही खालची पातळी गाठली तरी त्याविरोधात मूग गिळून बसण्याचे कर्तव्यही फुकट्या पुरोगामी, बुद्धिजीवी वर्गाने निभावले. पण कंटकाकीर्ण मार्गावरही राष्ट्रवादाची यशोगाथा फुलवण्याची जिद्द बाळगणाऱ्यांना जनतेनेच पसंत केले आहे, त्यामुळे ममता असो वा अन्य कोणी त्यांचे घरी बसणे निश्चित आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@