‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना नुकताच फ्रान्सतर्फे ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला. तेव्हा, आज जाणून घेऊया या तंत्रज्ञानाच्या कक्षा भेदणाऱ्या माणसाविषयी...
अंतराळ क्षेत्रात भारताचे नाव कोरणाऱ्या ‘इस्रो’ची ख्याती जगभरात आहेच. ‘मिशन शक्ती’, ‘चांद्रयान’, ‘मंगळयान’ मोहिमांसह नैसर्गिक आपत्तींचीही पूर्वसूचना देणाऱ्या या अंतराळ संस्थेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचीही उंची तितकीच मोठी आहे.
‘इस्रो’चे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार हे त्यापैकीच एक. नुकताच त्यांना फ्रान्सतर्फे ‘सर्वोच्च नागरी सन्मान’ प्रदान करण्यात आला. फ्रान्स सरकारतर्फे देण्यात येणारा ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. भारत आणि फ्रान्स या उभय देशांतील अवकाश संशोधनाच्या कार्यामध्ये प्रमुख भूमिका बजावल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यावतीने फ्रान्स राजदूत अॅलेक्झांडर जीगलर यांनी दिल्लीतील फ्रान्सच्या दूतावासात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ए. एस. किरण कुमार यांच्या कार्यकाळात दोन्ही देशातील अवकाश तंत्रज्ञान वेगळ्या उंचीवर गेल्याचा उल्लेख फ्रान्सकडून करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे भारतात देशाच्या प्रगतीसाठी किंवा अन्य क्षेत्रातील योगदानासाठी ‘भारतरत्न’ हा पुरस्कार दिला जातो, त्याचप्रमाणे फ्रान्समध्ये ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार देण्यात येतो. १८०२ मध्ये नेपोलियन बोनापार्टतर्फे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. फ्रान्सच्या प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. फ्रान्सतर्फे भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळणे हे तितकेच अभिमानास्पद ठरते.
ए. एस. किरण कुमार म्हणजेच अलुरू सीलिन किरण कुमार यांचा जन्म दि. २२ ऑक्टोबर, १९५२ रोजी कर्नाटक येथील हासन या गावी लिंगायत समाजात झाला. त्यांचे वडील वकील होते. त्यातच बालपणापासून त्यांच्यावर करिअर निवडण्याबाबत कोणताही दबाव नव्हताच. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे सर्व सख्खी-चुलत भावंडे एकाच घरात बागडत असत. मात्र, या साऱ्यांमध्ये अलुरू वेगवेगळे प्रयोग करण्यात पटाईत होते. त्यांच्या विविध प्रयोगांनी ते साऱ्यांना चक्रावून सोडत. घरात येणाऱ्या प्रकाशझोतांवर प्लास्टिक बसवून त्यावर काहीतरी लिहून एखाद्या प्रोजेक्टरप्रमाणे त्याचा वापर ते करत. शाळेतली प्रयोगशाळा म्हणजे त्यांच्यासाठी दुसरे रमण्याचे ठिकाण होते. ‘व्ह्यू मास्टर’ या उपकरणाद्वारे ‘थ्री-डी’ चित्र पाहिल्यावर स्वतःच्या कल्पनाविश्वात ते रमून जायचे. त्यातूनच त्यांना त्यामागे वापरण्यात आलेले तंत्रज्ञान जाणून घेण्याची इच्छा निर्माण होत असे. कनिष्ठ महाविद्यालयात असताना त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितशास्त्र हे विषय निवडले होते. पुढे जाऊन डॉक्टर बनण्याची इच्छा लहानपणापासून त्यांनी बाळगली होती. मात्र, लहानशा अडचणीमुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेशासाठी त्यांचे वय २२ दिवसांनी कमी पडले. त्यावेळी ते १६ वर्षांचे होते. पुढील वर्षाची वाट पाहण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या भागात सुरू झालेल्या फिजिक्स ऑनर (भौतिकशास्त्र) या अभ्यासक्रमाची निवड केली. त्यानंतर वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊ, असा विचार त्यांनी केला.
या अभ्याक्रमादरम्यान प्राध्यापक नरसिम्हीया यांच्याशी त्यांची ओळख झाली. ए. एस. किरण कुमार यांनी त्यांची समस्या प्राध्यापकांसमोर बोलून दाखवली. त्यावेळी त्यांना मिळालेला सल्ला मोलाचा होता. “तू कोणतेही क्षेत्र निवड, पण त्यात इमानदारीने काम कर. कुठल्याही क्षेत्रात काम करताना समाजासाठी दिलेले योगदानच लोक लक्षात ठेवतात.” प्राध्यापकांचा हा सल्ला किरण कुमार यांच्या मनात खोलवर रुजला. याच दरम्यान १९६९ मध्ये अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ पहिल्यांदाचा चंद्रावर पोहोचली होती. चंद्रावर मानवाने पाऊल ठेवतानाचा तो काळ होता. ही बातमी रेडिओवर ऐकल्यानंतर प्रभावित झालेल्या कुमार यांनी अवकाश संशोधन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. १९७१ मध्ये ‘नॅशनल कॉलेज ऑफ बंगळुरू’मधून त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली. याच महाविद्यालयातून १९७३ मध्ये इलेक्ट्रॉनिक्समधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी भौतिकशास्त्र अभियांत्रिकीत एम.टेक ही पदवी संपादन केली. बी.एस्सी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (एसएसी) नोकरी लागली.
मात्र, शिक्षण पूर्ण करण्याकडे लक्ष देत १०७५ मध्ये ते ‘एसएसी’त रुजू झाले. या कार्यप्रवासात २०१२ पर्यंत त्यांनी ‘एसएसी’मध्ये संचालकपदापर्यंत मजल मारली. २०१५ ते २०१८ पर्यंत त्यांनी ‘इस्रो’चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ‘चांद्रयान प्रथम’, ‘मंगळयान’ उपग्रह आदींचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. १९९४ मध्ये त्यांना ‘इंडियन सोसायटी ऑफ रिमोट सेंसिंग पुरस्कार,’ २०१४ मध्ये ‘पद्मश्री पुरस्कार,’ २०१५ मध्ये ‘जीआयटीएएम विद्यापीठा’तर्फे ‘डॉक्टरेट पदवी,’ २०१७ मध्ये ‘विजयरत्न’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. किरण यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat