नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिलाच मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेत त्यांनी महत्वाच्या बदलांना मंजुरी दिली. पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत माजी सैनिक, शहीद झालेले सैनिक अथवा तटरक्षक दलातील सैनिक अधिकाऱ्यांचे पाल्य अथवा विधवा यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते.
नव्या बदलानुसार, आता दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलांनाही या योजनेचा फायदा घेता येणार आहे. ज्यांनी देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्यासाठी हा निर्णय असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी दिलेल्या मंजुरीत शिष्यवृत्तीतही वाढ करण्यात आली. यापूर्वी विद्यार्थ्यांना दरमहा २००० रुपये तर विद्यार्थिनींसाठी दरमहा २२५० रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येत होती. मात्र आता नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना दरमहा २५०० रुपये तर विद्यार्थिनींसाठी दरमहा ३००० रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat