नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ प्रमाणेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाने प्रचंड विजय मिळवला. अमित शाह यांचे संघटनकौशल्य, कार्यकर्त्यांनी घेतलेली अपार मेहनत आणि सर्वसामान्य जनतेने आपल्या अपेक्षापूर्तीसाठी दाखवलेल्या अतूट विश्वासामुळे मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले. मोदी सरकारच्या याच पुनरागमनावर जनसंघ आणि भाजप असा प्रवास पाहिलेल्या विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्राचे संस्थापक पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांनी लिहिलेला हा विशेष लेख...
अत्यंत प्रखर विरोध असूनही नरेंद्र मोदी यांचा प्रचंड विजय होऊ शकला. याचे विश्लेषण आणि मूल्यांकन, आपापल्या परीने सर्वजण करीत आहेत. अनेक बाजूंनी प्रामाणिकपणे विचार केल्यानंतर या विषयाचे सर्वंकष चित्र उभे राहू शकेल. हे सुनिश्चित आहे की, कोणताही एकच घटक यासाठी कारणीभूत नाही. मोदीजी यांचे विश्वसनीय नेतृत्व, ते प्रतिनिधीत्व करत असलेली प्रभावी विचारधारा, त्यासाठी गेल्या ६०/७० वर्षांत अनेकांनी केलेले जिवापाड प्रयास, गेल्या ५ वर्षांतील कामाचे जाणवणारे सुपरिणाम, अन्य कोणतीही व्यक्ती वा विचारधारा या स्पर्धेत जवळपासही नसणे, असे अनेक घटक या विजयाला कारणीभूत आहेत.
नरेंद्र मोदी हे रा. स्व. संघाचे समर्पित पूर्णवेळ कार्यकर्ता (प्रचारक) होते. संघाचा प्रचारक म्हणजे व्यक्तीगत जीवनाचा पूर्णपणे त्याग, व पूर्णवेळ संघकामासाठी समर्पित जीवन, राजकारणात ते स्वेच्छेने आले नव्हते. संघ अधिकार्यांनी त्यांना राजनीतीमध्ये पाठविले होते. ज्यांच्या हाताखाली त्यांना काम करावयास सांगितले होते, ते अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, कुशाभाऊ ठाकरे, मुरली मनोहर जोशी हेही सर्वजण अशाच प्रकारे संघ कामातून राजकीय क्षेत्रात पाठविलेले कार्यकर्ते होते. अन्य कोणत्याही विचारधारेचे प्रतिनिधी-पुढारी व भाजपचे अशाप्रकारे पुढे आलेले नेतृत्व, यात हा मूलभूत फरक आहे. त्यामुळेच मूळ राजनीतीविषयी संकल्पना व तेथील कामाची पद्धती, यामध्ये भाजप व अन्य राजनैतिक दले, यामध्ये महद्ंतर पडते.
मी स्वतः १९५२ पासूनच्या सर्व लोकसभा निवडणुकीचा निकटचा साक्षीदार आहे. या सगळ्या विषयाचा एक संघ कार्यकर्ता म्हणून अभ्यासकही आहे. जनसंघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतची राजकीय क्षेत्रातील या विचारधारेची वाटचाल मी जवळून अनुभवली आहे. २०१४ सालच्या मोदीजींच्या विजयानंतर इंग्लंडमधील ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने एक मार्मिक टिप्पणी केली होती. “स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात प्रथमच, खर्या अर्थाने गैरकाँग्रेसी व विशुद्ध भारतीय परंपरेचा वारसा सांगणारे सरकार मोदीजी व भाजप यांच्या रूपाने आले आहे.”
अर्थात तीन कालांशात मिळून सुमारे ५/५.५ वर्षे असलेले अटलजींचे सरकार, ही त्यांची रुजवात होती. पण त्याच्या फार मर्यादा होत्या. गेल्या ५ वर्षांच्या विविध उपलब्धीनंतर, प्रखर व बहुमुखी विरोध असताना अनेकांच्या दृष्टीने अनपेक्षित असलेला आत्ताचा विजय हा या देशाच्या राजनीतीच नव्हे, तर संपूर्ण समाज जीवन व राष्ट्रजीवन यांची वेगळी दिशा दर्शित करणारा-प्रस्थापित करणारा आहे. मोदीजींचे आणखी एक विशेष म्हणजे प्रचारक या नात्याने दिल्लीमध्ये, मुख्यतः संघटनात्मक काम करीत असताना त्यांना आकस्मिकपणे मुख्यमंत्री म्हणून गुजरातमध्ये पाठविले गेले. तत्पूर्वी त्यांनी स्वतः ग्रामपंचायतची निवडणूकसुद्धा लढविली नव्हती. मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांना ‘अस्मानी व सुलतानी’ अशा दोन्ही महासंकटांना तोंड द्यावे लागले. गुजरातमधील भयंकर भूकंप व संपूर्ण ‘गोध्राकांड’ हे सत्त्वपरीक्षा पाहणारे विषय होते. या दोन्ही संकटातून विलक्षण निष्ठा, अमाप परिश्रम व प्रगल्भ राजकीय दृष्टी यामुळे मोदीजी हे उजळून बाहेर पडले. त्या काळात हे सर्व जवळूनच पाहणार्या माझ्यासारख्याला त्यांच्या क्षमता व सहनशक्ती याविषयी आश्चर्य वाटत असे. राजकीय प्रगल्भता व संघटनकौशल्य यांच्या आधारावर त्यांनी गुजरात राज्यालाही देशभरात प्रथम क्रमांकावर नेले.
१९८९-९० पासून गेली ३० वर्षे, राजकीय व राष्ट्रीय ध्रुवीकरणाची प्रक्रिया आकार घेत होती. रा. स्व. संघ व संबंधित असंख्य संघटना, समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत मूलभूत सांस्कृतिक विचार व व्यवहार रुजविण्याचा कसोशीने प्रयास करीत होते. क्षेत्रानुरूप कार्यपद्धतीमध्ये भिन्नता होती. पण मूळ सूत्र एकच होते. १९८५-९० या काळामध्ये तत्कालीन सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरस यांनी हिंदू व्होट बँक ही संकल्पना प्रथम मांडली. राजकीय दृष्टीने हिंदुत्वाविषयी जागृत नसणारा या देशातील बहुसंख्य समाज, अस्मिता हरवून बसलेला होता. त्याचे जागरण या विविध प्रयासातून हळूहळू सामर्थ्य धारण करीत होते. श्रीराम मंदिर आंदोलन, हा त्यातला फार मोठा टप्पा होता. याचसोबत, सेवाक्षेत्रातील असंख्य कामांच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील विविध वर्ग या विचारधारेच्या जवळ येत होते. परिणामतः टप्याटप्प्याने राजकीय क्षेत्रात यश मिळत असल्याचा अनुभव येत होता.
"" People get the government. they deserve '' हे प्रसिद्ध व मार्मिक वाक्य आहे. बहुधा ते पूर्ण सत्य आहे. उत्तम शासनासाठी सामाजिक मन प्रगल्भ हवे. समाज व राष्ट्र म्हणून आम्हाला काय हवे, याची सर्वांना जाणीव व्हावी व ती मतदानात प्रतिबिंबित झाली पाहिजे. आजपर्यंतच्या निवडणुकांत, क्षुद्र व्यक्तीगत स्वार्थ, स्थानिक हितसंबंध, जातवाद, भाषावाद, भाई-भतीजा वाद, कौटुंबिक राजनीती, या सर्वांचा निवडणुकीच्या राजकारणावर प्रचंड प्रभाव-अनुभवास येत होता. गेल्या १५ वर्षांत तो हळूहळू कमी होत, या निवडणुकीत हे सर्व घटक क्षीण होऊन, मूळ सांस्कृतिक राष्ट्रवाद व राजकीय क्षेत्रातील कार्यक्षम समर्पित संघटन, हे समाजाला योग्य वाटेल, असे वातावरण निर्माण होऊ शकले. We should make, develop people in such a way which is beyond their petty interests and contribution for a strong nation building. गेल्या १५-२० वर्षांच्या कालावधीत या दृष्टीने निश्चित चांगली वाटचाल झाली आहे.
आत्ताचे निवडणुकांचे निकाल, हे त्याचे फलस्वरूप आहे. यातून मतदात्यांची प्रगल्भता अनुभवाला येते. संपूर्ण राष्ट्राच्या सुप्त एकतेचे जागरण, हे आता प्रकट स्वरूप धारण करू लागले आहे. प. बंगाल, पूर्वांचल व कर्नाटकमधील भाजपचा विजय, हे त्याचेच लक्षण आहे. म्हणूनच हा केवळ राजकीय क्षेत्रातील विजय नसून, देशातील सर्वंकष समाजाची पुनरुत्थानाच्या दिशेने सांस्कृतिक वाटचाल आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. राष्ट्र-देशबांधणीसाठी मजबूत संघटनसूत्र याची आवश्यकता असते. रा. स्व. संघाचे ‘संघटनसूत्र’ हेच अत्यंत महत्त्वाचे निधान आहे. त्याच्याच आधारावरती हे व्यापक मानसिक व राजकीय परिवर्तन झाले आहे. या शीर्षस्थानी नरेंद्र मोदी आहेत. भक्कम संघटनसूत्र बांधणारे अमित शाह आहेत, पण त्याच्या जोडीला, संपूर्ण महानगरापासून गिरीकंदरापर्यंत असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने बांधलेले ‘संघटनसूत्र’ आहे. खर्या संघटित शक्तीचा, संघभावनेचा संघ व्यवहाराचा हा विजय आहे.
एक महत्त्वाचा टप्पा पार पडलेला आहे. दीर्घकालीन राष्ट्रबांधणीचे काम पुढेच आहे, म्हणून आत्मसंतुष्ट न होता आपापल्या क्षेत्रात याच कार्याची शक्ती व व्याप्ती वाढविण्यासाठीचे प्रयास चालू ठेवावे लागतील. रा. स्व. संघ, संघ म्हणून निवडणूक प्रक्रियेत भाग घेत नाही. संघाचा कार्यविचार व कार्यक्षेत्र त्यापेक्षा कितीतरी व्यापक आहे. म्हणूनच या निमित्ताने सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केलेले विचार आपणा सर्वांसाठी मार्गदर्शी आहेत. ते म्हणतात, “पुनश्च स्थिर सरकार मिळाल्याने कोट्यवधी भारतीय सुदैवी आहेत. हा राष्ट्रीय शक्तीचा विजय आहे. या लोकशाहीच्या विजयात योगदान देणार्या प्रत्येकाला शुभेच्छा! जगासमोर पुन्हा एकदा लोकशाही आदर्श व भावना प्रकट झाल्या. नवे सरकार सामान्यजनांच्या आशा-अपेक्षांची पूर्तता करण्यास यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता कटुता संपेल व जनतेने दिलेला कौल, नम्रतेने स्वीकारला जाईल, अशी आशा आहे.”
नवीन लोकसभा सदस्यांमार्फत पंतप्रधान म्हणून निवड झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी ही अशीच उदार भावना व्यक्त केली. निवडणुकीत आपणाला मते देणारे व न देणारे सर्वच जण आपले आहेत. सर्वांना बरोबर घेऊन, ‘सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास,’ या त्रयीच्या आधारावर गतीने देश बलवान होण्याकडे वाटचाल होईल. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंदांनी व २१ व्या शतकाच्या सुरुवातीला राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारताच्या कर्तृत्वाविषयी व भवितव्याविषयी जी इच्छा व अपेक्षा व्यक्त केली होती, त्या दिशेने संपूर्ण समाज वाटचाल करीत राहील, असा संकल्प आपण सर्वजण करूया.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat