नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपकडून झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. सर्वात आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपला राजीनामा सादर केला आणि आता कितीतरी राज्यांचे राज्य प्रदेश प्रभारीदेखील राजीनामा देत आहेत.
काँग्रेसच्या आसामपासून पंजाबपर्यंत आणि मध्य प्रदेशपासून राजस्थानपर्यंतच्या दिग्गज नेत्यांनी आपापल्या पदांच्या राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. आतापर्यंत १३ वरिष्ठ नेत्यांनी आपला राजीनामा राहुल गांधींकडे पाठवला आहे. राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण काही वृत्तांनुसार, राहुल अजूनही राजीनाम्यावर ठाम आहेत. असेही म्हटले जाते की, राहुल यांनी काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांना आपली ‘रिप्लेसमेंट’ शोधायला सांगितली आहे, तर राहुल गांधींच्या मदतीसाठी पक्षात कार्याध्यक्ष नावाचे पद निर्माण करण्यात येणार असल्याचेही म्हटले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पक्षाचे प्रभारी अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या दुसर्याच दिवशी राजीनामा देण्याची घोषणा केली. पंजाब काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखड, झारखंड काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार आणि आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनीही सोमवारी आपले राजीनामे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे पाठवले. काँग्रेस नेत्यांच्या या राजीनामासत्रामुळे मात्र आता निवडणुका झाल्यानंतर नेमका काय फरक पडणार?, नेमके काय साध्य होणार?, असाही प्रश्न विचारला जात आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat