प्रश्न वृक्ष सोयरिकीचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2019   
Total Views |




नुकतीच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने जगातील राष्ट्रांमधील वृक्षगणना करून त्या राष्ट्रांतील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रती व्यक्ती मागे किती वृक्ष संख्या आहे, याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यातील आकडेवारी ही खरोखरच विचार करावयास भाग पाडणारी आहे.

 

वृक्षवल्ली आम्ही सोयरे वनचरे.... या संत काव्याची आणि ‘यावत भूमंगल धत्ते स शैले वनकामनमया स्कंद पुराणातील संस्कृत श्लोकाची आढळ भारतात आहे. मात्र, तरीही भारतात वृक्षांबाबत असणाऱ्या सोयरिकीचा प्रश्न आजही उपस्थित होत आहे. येत्या ५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्ताने अनेक वृक्षप्रेमी, सामान्य नागरिक, तरुणाई, समाजमाध्यमप्रेमी वृक्ष लागवड, त्यांचे संगोपन, संवर्धन याकामी जागर करताना दिसून येतील. मात्र, भारतात वृक्षलागवडीचे विदारक वास्तव संयुक्त राष्ट्र संघटनेने जारी केलेल्या अहवालात समोर आले आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या नजीकच्या काळात प्रसिद्ध झालेल्या या अहवालावरून आपल्याला भारतीय नागरिकांच्या वृक्षांबाबतच्या सोयरिकीच्या प्रश्नाबाबत मंथन करण्याची म्हणूनच गरज आहे.

 

नुकतीच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने जगातील राष्ट्रांमधील वृक्षगणना करून त्या राष्ट्रांतील लोकसंख्येच्या प्रमाणात प्रती व्यक्ती मागे किती वृक्ष संख्या आहे, याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यातील आकडेवारी ही खरोखरच विचार करावयास भाग पाडणारी आहे. या प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार २०१४च्या जनगणनेनुसार रशियामध्ये ४,४६१ वृक्ष प्रती व्यक्तीमागे आहेत, तर अमेरिकेत प्रती व्यक्तीमागे ७१६ वृक्ष आहेत. ब्राझीलमध्ये १,४९४ वृक्ष प्रती व्यक्तीमागे आहेत. कॅनडा या देशात प्रती व्यक्तीमागे ८,९५३ वृक्ष आहेत, तर चीनमध्ये १०२ वृक्ष प्रती व्यक्तीमागे आहेत आणि भारतात प्रती व्यक्तीमागे २८ वृक्ष आहेत. गणनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या काही देशांची लोकसंख्या भारतापेक्षा कमी आहे, हे जरी मान्य केले तरी त्यांचे क्षेत्रफळदेखील भारतापेक्षा कमी आहे, हेदेखील आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. कमी क्षेत्रफळ असूनही या राष्ट्रांनी फुलविलेली वनराई हा आपल्यासाठी निश्चितच आदर्श असा वस्तुपाठ आहे, हे नाकारता येणार नाही. यातील बव्हंशी देश हे प्रगत आहेत. तेथे औद्योगिकीकरण झालेले आहे. नागरी सुविधा देखील उच्च आहेत. तरीही तेथे वृक्षांची संख्या प्रती व्यक्तीमागे जास्त आहे. त्यामुळे विकास साधताना वृक्षांची कत्तल करणे अपरिहार्य आहेच. या धारणेला हे गणित निश्चितच तडा देते, हे नक्की.

 

विकसनशील असणाऱ्या भारतात विविध विकासकामे करताना अडथळा ठरणारी वृक्षसंपदा हटविणे आवश्यक आहे. या विचाराला या देशातील हे आकडे निश्चितच छेद देतात. तसेच, विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करताना निसर्गाची जोपासना करणेही आवश्यक आहे. हे आपण जरी जाणत असलो तरी, त्यासाठी आपण भारतीय म्हणून केवळ प्रयत्न न करता प्रयत्नांना कृतिशीलतेची जोड देणे आवश्यक असल्याचे हे आकडे आपल्याला सांगत आहेत. यादीत समाविष्ट असणाऱ्या देशांतदेखील औद्योगिकीकरणाचा वेग प्रचंड राहिला आहे. उद्योगविश्वाचा विस्तार करताना देशातील प्रदूषण कमी व्हावे किंवा देशात प्रदूषणाची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी येथे ताजे वारे प्रवाहित होणे आवश्यक असल्याचे या देशांनी जाणले आणि वृक्ष लागवडीस चालना दिली, हेच या अहवालावरून दिसून येतेे. तसे, पाहता या प्रसिद्ध झालेल्या अहवालात आशिया खंडातील देशांची संख्या कमी आहे. म्हणजे जेथे औद्योगिक क्रांतीचा जन्म झाला त्या युरोपातील देशांची संख्या जास्त आहे. म्हणजेच, जेथे उद्योगास प्रारंभ झाला तेथील आणि जेथे कालांतराने उद्योगाचे वारे वाहिले, त्या भारतात असणारी प्रती व्यक्तीमागील वृक्षांची संख्या हा चिंतेचा विषय ठरत आहे.

 

आजमितीस भारतात वृक्षलागवड, प्लास्टिकबंदी यांसारख्या योजनांतून वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन यावर शासन नक्कीच कार्य करत आहे. मात्र, केवळ शासकीय प्रयत्नच याकामी पुरेसे नसून भारतातील प्रत्येक व्यक्तीने याकामी पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत वृक्ष साथ देत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमागे वृक्षसंख्या वृद्धिंगत करणे हे आपले सर्वांचेच दायित्व आहे व ते आपण निभावणे आवश्यक आहे, हेच या अहवालावरून दिसून येते. आगामी मान्सूनच्या तोंडावर जाहीर झालेला हा अहवाल पाहता आपण सर्वांनीच या मान्सूनमध्ये जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्याची, वर्षाचे ३६५ दिवस वृक्षांशी आणि पर्यावरणाशी सोयरिक साधण्याची प्रतिज्ञा करत येणारा जागतिक पर्यावरण दिन साजरा करूयात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@