रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत ४ लाख,५० हजार,५८१ मतांनी विनायक राऊत जिंकले असून निलेश राणेंना २ लाख ७४ हजार ५४७ मते मिळाली आहेत. त्यांच्या विजयानंतर जिल्ह्यात सगळीकडेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
दरम्यान, सुरुवातीपासूनच महायुतीचे उमेदवार राऊत यांनी आपली आघाडी कायम राखली होती, तर या लढाईत स्वाभिमानचे उमेदवार आणि नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांना मोठ्या मताधिक्क्याने हार पत्करावी लागली.दरम्यान, काँग्रेसच्या नवीनचंद्र बांदिवडेकर यांना फक्त पन्नास हजार मतांवर समाधान मानावे लागले. हा पराजय निलेश राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
खासदार राऊतांच्या विजयानिमित्त दोडमार्गात युतीचा जल्लोष
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून खासदार विनायक राऊत सलग दुसर्यांदा विजयी झाले असून सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष व्यक्त केला. त्यानंतर युतीच्या वतीने विजयी रॅली तालुक्यात काढण्यात आली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार विनायक राऊत महाराष्ट्र स्वाभिमानचे डॉ.निलेश राणे आणि काँग्रेसचे नवीन चंद्र बांदिवडेकर अशी तिरंगी लढत झाली. मात्र खरी लढत स्वाभिमान व सेना अशीच होती. या मतदारसंघात काटे की टक्कर होईल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र सगळे अंदाज निष्प्रभ ठरवीत सेनेचे खासदार विनायक राऊत १ लाख ६९ हजार च्या मताधिक्याने विजयी झाले. हा विजयोत्सव तालुक्यातील युतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत साजरा केला. तसेच तालुक्यात विजयी रॅली काढण्यात आली. विनायक राऊत यांना ४५४५०० मते तर डॉ.निलेश राणे यांना २७७८०९ मते मिळाली आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat