लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढत असून नुकतीच तब्बल २० हजार क्विंटलच्या आसपास विक्रमी आवक झाल्याची नोंद केली आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असूनही दरवर्षीपेक्षा उन्हाळ कांद्याचे विक्रमी उत्पादन हाती आल्याचे दिसत आहे.
सध्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान सहाशे ते कमाल १ हजार १२१ रूपये व सरासरी ८५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. व्यापाऱ्यांनी चाळीत कांदा साठवणुकीला सुरुवात केली असून, ७० टक्के चाळी भरल्या गेल्या आहेत. लवकरच उर्वरित ३० टक्के साठवणूक चाळी भरल्या जातील. दुष्काळ असतानाही कांद्याची आवक वाढण्यात शेतकऱ्यांनी उभारलेल्या शेततळ्यांचे अधिक योगदान असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, १५ एप्रिलपर्यंत व्यापाऱ्यांकडून साठवणूक झाल्यानंतर बाजारात चढ-उताराची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी कांद्याला चांगले दर मिळाले नव्हते. मागील दोन वर्षांपासून देशांतर्गत गरजेपेक्षा अधिक उत्पादन होत आहे. निर्यातीला चालना मिळत नसल्याने देशांतर्गत भावही उंचावत नाही. या हंगामात काय स्थिती राहील याचा अंदाज उत्पादक बांधत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat