नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा आता भाजपकडूनही चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. मणिशंकर अय्यर हे शिविगाळ करणार्या टोळक्यांचा म्होरक्या आहेत आणि निर्लज्जपणे आपल्या खालच्या पातळीवरील शिव्यांचे समर्थन करत असतात, असा जोरदार पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे.
२०१७ मध्ये शिविगाळ आणि माफी
डिसेंबर २०१७ मध्येही अय्यर यांनी मोदी यांना अशीच शिविगाळ केली होती नंतर आपली हिंदी कमजोर असल्याचे कारण देत, माफीही मागितली होती. आता ते मोदींना दिलेल्या शिवीचे समर्थन करीत आहेत. काँग्रेसने त्यांना निलंबित केले आणि नंतर निलंबन मागे घेतले. काँग्रेसचा अहंकार आणि मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे, असे टि्वट भाजपाचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी केले.
मोदींविरोधात बोलणारे सर्वच नेते गांधी घराण्याशी एकनिष्ठ
पाकिस्तानप्रेमी असलेले अय्यर मोदी यांना राष्ट्रविरोधी ठरवतात, पण देशाला माहीत आहे की, कोण देशभक्त आहेत. अय्यर यांनी नेहमीच परिवारभक्ती निभावली आहे. शिविगाळ करणारे सर्वच नेते गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहेत, ही सत्यता देखील देशाला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.
पित्रोदांवरही टीका
भाजपाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालविय यांनीही अय्यर यांच्यावर हल्ला चढविला. अलीकडेच गांधी घराण्याचे भक्त सॅम पित्रोदा यांनी, शीखसंहारावर ‘झाले ते झाले, मग आता काय’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनीही, आपली हिंदी अतिशय खराब असल्याने ही चूक झाल्याची सावरासावर केली. आता त्यात अय्यर यांनीही भर घातली, असे टि्वट मालविय यांनी केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat