तेलंगणा : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वायएसआर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि टीआरएसचे अध्यक्ष तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पाळीव कुत्रे असल्याचे चंद्राबाबू यांनी म्हटले आहे. यामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले असून अशी भाषा वापरल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
मचिलीपटनम येथे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप आणि जगनमोहन रेड्डी यांच्यावर आरोप करताना चंद्राबाबू जोश मध्ये येऊन बरळले, ते म्हणाले, " निर्लज्ज जगमोहन रेड्डी कुत्र्याची बिस्किटे खात आहेत. जगनमोहन आणि केसीआर हे दोघेही मोदींचे पाळीव कुत्रे असून बिस्किटासाठी मोदींच्या समोर घुडगे टेकून बसले आहेत. ही बिस्किटे ते तुम्हालाही देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा नेत्यांपासून तुम्ही सावध राहा." त्यामुळे आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आणखी राजकीय चिखलफेक पाहायला मिळणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat