जिंतूर : "धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार तोडपाणी करतात, ते गोपीनाथ मुंडे यांचे वारस होऊ शकत नाहीत," असा घणाघात राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. जिंतूर येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. अनेक घरात भांडणे लावण्याचे काम राष्ट्रवादीने केल्याचा आरोपही पंकजा मुंडे यांनी यावेळी केला आहे.
'गोपीनाथ मुंडे जेव्हा विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांनी सत्तेतल्या सरकारला जेरीस आणले होते. पण आत्ताचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे एकीकडे मंत्र्यांच्या विरोधात लक्षवेधी लावतात आणि दुसरीकडे सेटिंग करतात', अशी घणाघाती टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.
'तोडपाणी करणारे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि त्यांचे आमदार गोपीनाथ मुंडेंचे वारस होऊ शकत नाहीत,' असे पंकजा मुंडे म्हणाल्या. अनेक घरांमध्ये भांडणे लावण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. मुंडे घराण्याला ते घराणेशाही बोलतात, पण बारामतीला जाऊन चमचेगिरी करतात, असा टोलाही पंकजा मुंडेंनी लगावला. महायुतीचे खासदारकीसाठीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे जिंतूरमध्ये आल्या होत्या.
धनंजय मुंडेंकडून प्रत्युत्तर
दरम्यान पंकजा मुंडेंच्या या आरोपाला धनंजय मुंडे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. 'मी वारस नाही. वारसा फक्त पंकजा मुंडे चालवत आहेत. वैद्यनाथ कारखान्यावर जप्ती आली. बीड जिल्ह्यात अजूनही विकासकामे का झाली नाहीत. तुम्ही ५ वर्ष सत्तेत होतात, पण बीड जिल्ह्याला काय दिले?, असा प्रश्न त्यांनी विचारला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat