मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकने आपले पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. आता रेपो रेट ६.२५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर आणला आहे. आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी ही रेपो रेट दर कपातीची घोषणा केली. यामुळे कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. साडे सहा वर्षातला हा सर्वात कमी रेपो रेट आहे. महागाई कमी झाल्यामुळे रिझर्व बँकेने हा निर्णय घेतल्याचे समजते आहे. घरबांधणी क्षेत्राला यामुळे चालना मिळेल, तसेच घर घेणारे आणि उद्योजक, दोघांनाही कर्ज घेणे सोपे होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
मध्यम आणि छोट्या उद्योजकांसाठी पत वाढ कमी करण्यात आली आहे. वित्तीय स्थितीवर सतर्क राहणे गरजेचे आहे. खाद्य महागाई दर चांगल्या स्थितीत आहे, असे दास यांनी म्हटले आहे.जानेवारी - फेब्रुवारी या महिन्यांमध्ये निर्यात चांगली राहीली आहे. गृहनिर्माण क्षेत्रात वित्तव्यवस्था चोख राखण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. एमपीसीची पुढील बैठक ३, ४ आणि ६ जूनला होणार आहे.
रेपो दर कमी झाल्यामुळे ईएमआय कमी होणार आहेत. तर, होम लोनचेही ईएमआयदर कमी होणार आहेत. आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये महागाई दर सहा महिन्यात पहिल्यांदा २.९ ते ३.० टक्के झाले आहेत. तर पुढच्या सहा महिन्यात महागाई दर ३.५ ते ३.८ टक्के राहण्याची शक्यता आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat