ठाणे : ठाणे न्यायालयाने राहुल गांधी आणि कर्नाटकातील सीपीआय (एम)चे महासचिव सीताराम येचुरी यांना समन्स बजावले आहे. त्यांना ३० एप्रिलपूर्वी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याविरोधात पत्रकार गौरी लंकेश हत्येचा संबंध आरएसएसशी जोडल्याने बदनामीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विवेक चंपानेरकर यांनी तक्रार दाखल केली असून राहुल गांधी आणि येचुरी या दोघांकडून प्रत्येकी १ रुपयाची भरपाई मागितली आहे. लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ ला बंगळुरु येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर हत्या झाली होती. याच कारणाने आएसएस कार्यकर्ते आणि वकील धृतिमन जोशी यांनीही मुंबई न्यायालयात गांधी आणि येचुरी यांच्याविरोधात बदनामीची तक्रार दाखल केली आहे.
राहुल गांधी यांनी 'जे कोणी भाजप किंवा आरएसएस विचारधारेविरोधात बोलते, त्यांच्यावर दबाव आणला जातो किंवा धमकी दिली जाते किंवा त्यांच्यावर हल्ला केला जातो किंवा त्याला ठार केले जाते,' असे म्हटल्याचे जोशी यांनी तक्रारीत म्हटले आहे. येचुरी यांनीही 'आरएसएस विचारधारा आणि आरएसएसशी संबंधित व्यक्तींनीच लंकेश यांची हत्या केली,' असे म्हटल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat