आपण आणि श्रीलंका...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019
Total Views |


आपल्याकडे छद्मी पुरोगामी आपल्या सेक्युलरिझमचा खोटा बुरखा फाटू नये म्हणून ज्या प्रकारचे तर्क देत असतात, त्याच्या चिंध्या करणारी ही कृत्ये आहेत. श्रीलंकेत झालेला हा हल्ला काही पहिला नव्हे आणि शेवटचा नाही. उलट याला जोपर्यंत कठोर उत्तर दिले जात नाही, तोपर्यंत अशी कृत्ये करणार्‍यांचे मनोबल वाढतच राहणार आहे. श्रीलंका त्याचा मुकाबला कसा करते ते पाहावे लागेल.

 

श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोट मालिकांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या श्रीलंकन नागरिकांच्या आकड्यात भर पडत असतानाच समोर येणारी माहितीही धक्कादायक आहे. श्रीलंकेत घडणारे बॉम्बस्फोट हे कोणत्या धर्माच्या मंडळींनी केले हे उघड आहे. त्या धर्माच्या नव्हे, तर धर्मातल्या धर्मांधांनी हे केले हा तर्क मान्य केला तरी, वास्तव म्हणून जे समोर येत आहे ते विचार करायला लावणारे आहे. योगायोग असा की, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपी ठरविण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांना लोकसभेचे तिकीट दिलेले असताना जी चर्चा सुरू आहे, त्या चचेर्र्च्या पार्श्वभूमीवर हे स्फोट झाले आहेत. कोणी म्हणेल की, या स्फोटांचा आणि प्रज्ञासिंह यांच्या तिकिटाचा काय संबध? श्रीलंकेत बॉम्बस्फोट झाल्यानंतर लंकेत आता बुरखाबंदीचा विचार हळूहळू पुढे येत आहे. बुरखाबंदीमुळे यापुढे श्रीलंका धर्मांध इस्लामी दहशतवाद्यांच्या यादीत असणार नाही, असे मुळीच नाही. पण, आपल्या देशाचा आणि नागरिकांचा शत्रू कोण, हे तरी त्यांना स्पष्ट कळले आहे.

 

एका लहानशा देशातली ही राजकीय सुस्पष्टता विचार करायला लावणारी आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत श्रीलंकेचा भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्या या दोन्हीच्या प्रमाणात विचार केला, तर ती दोन्हींमध्ये अत्यंत लहान. पण, ज्यावेळी महाराष्ट्रात असे साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हा या राज्याचे प्रमुख असलेल्या शरद पवारांनी काय केले होते? तर १२ बॉम्बस्फोटांऐवजी १३ बॉम्बस्फोट झाल्याची अफवा सर्वत्र पसरवली. हा १३ वा बॉम्बस्फोट मुस्लीम भागात झाल्याचे त्यांनी सांगितले. बॉम्बस्फोटांनंतर एका ठराविक समाजाच्या विरोधात रोष निर्माण होऊ नये व त्यांना त्याची झळ लागू नये, यासाठी त्यांनी असे केले होते. म्हणजे पवारांचे तरी असे स्पष्टीकरण होते. आता पवारसाहेब कसे सुसंस्कृत हे सांगणार्‍या मंडळींचा एक कंपू तेव्हाही तयार होता. या कंपूने या पराभूत मानसिकतेचे उदात्तीकरण केले आणि त्यांच्या साहेबांना धोरणी लोकात नेऊन बसविले. त्याचाच परिणाम म्हणून २0१४ पर्यंत महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडतच राहिले. डेव्हिड हेडलीसारखा दुहेरी काम करणारा दहशतवादी महेश भट्टच्याच मुलाला येऊन भेटतो.

 

मुंबईत व्यायामाचे प्रशिक्षण देणार्‍यांची मुळीच उणीव नसताना हा खतरनाक दहशतवादी याचाच शिष्य बनतो. इस्लामी दहशतवादी जितके निष्ठूर आणि क्रूर असतात, तितक्या शिताफीने ते आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या पायर्‍यादेखील निश्चित करीत असतात. माणसेही हेरताना ती अशीच मूर्ख असतील, याची काळजी घेतात. याच न्यायाने टायगर मेननने संजय दत्तला हेरले होते. त्याच्याकडे बॉम्बस्फोटाचे साहित्य होते की नव्हते, हा प्रश्न निर्माण झाला होता खरा. पण प्रकरण ‘एके ४७’ वरच निभावले. सुनील दत्त काय किंवा महेश भट काय, ही दोन्ही माणसे अशाच प्रकारची मूल्ये मानणारी होती. मानवी समाजाची वाटचाल जर नीट न्याहाळली, तर सगळा प्रवास काही मूल्यांच्या आधारावर सुरू आहे असे लक्षात येईल. कायदा एखादी चुकीची गोष्ट घडल्यानंतर त्यासाठी शिक्षा देण्याची तरतूद करू शकेल. मात्र, ती चुकीची गोष्ट घडूच नये यासाठी नैतिक दबाव निर्माण करण्याचे काम मूल्ये करतात. आधुनिक लोकशाहीची म्हणून स्वत:ची काही मूल्ये आहेत.

 

ही मूल्ये अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचे रक्षण बहुसंख्याकांनी करावी, अशी हमी मागतात. तत्त्वत: त्यात काही चुकीचे नाही. मात्र, अल्पसंख्याक बहुसंख्याच्या ऐहित हिताच्याच आड येतात आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष या विषयाचे मतपेढ्यांमध्ये परिवर्तन करण्यासाठी इशरत जहाँच्या जनाज्याला खांदा देण्यासाठी धावत जातात. तेव्हा मात्र ही मूल्ये पोपटपंची ठरतात. आपल्याकडे नेमके हेच चालू आहे. श्रीलंकेत बॉम्बस्फोट झाल्यानंतर आपल्याकडल्या काही इंग्रजी माध्यमांनी पहिल्या पानावर आपल्या स्टोरी छापायला सुरुवात केली. आत अल्पसंख्याकांना कसा त्रास होईल, असा काही त्यांचा सूर होता. आजही अशा प्रकारच्या बातम्या वृत्ते आणि लेख सुरूच आहेत. श्रीलंकन जनता आता चिडलेली आहे. दहशतवादाचे हे भूत कसे गाडता येईल, यामागे लंकेचे सरकार हात धुवून लागले आहे. तिथल्या माध्यमांमध्ये जे सुरू आहे, त्यापेक्षा आपल्याकडे विचित्र असे काही सुरू आहे. जागतिक मूल्यांची पोपटपंची करण्याची आणि स्वत:चे हितसंबध जपण्याची जी काही अमेरिकन पद्धत आहे, त्याचाच हा परिणाम आहे. काहीही झाले की, दहशतवादाला धर्म नसतो हा तर्क. मग पकडलेला दहशतवादी मूलतत्त्ववादी मुसलमान निघाला की शिक्षण व रोजगाराच्या अभावी तो अशी कृत्ये करतो हे असले तर्क दिले जातात. या विचारी पढतमूर्खांचे सगळे तर्क इस्लामी दहशतवाद्यांनीच मोडून काढले आहेत. ओसामा बिन लादेनचे शिक्षण अभियांत्रिकीपर्यंत झाले होते.

 

श्रीलंकेत बॉम्बस्फोट मालिकेच्या पार्श्वभूमीवर जी काही माहिती समोर येत आहे ती, तर निव्वळ धक्कादायक मानावी लागेल. दहशतवादी कारवायांचा अभ्यास करणार्‍यांना एकाच कुटुंबातील व त्या कुटुंबांशी संबंधित असलेल्या सर्वच लोकांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे आढळून आलेले नाही. श्रीलंकेतील प्रसिद्ध अशा मसाला व्यवसायाचे मालक मोहम्मद युसुफ यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ‘महावेल गार्डन’ या कोलंबोतील लब्धप्रतिष्ठितांच्या वस्तीत मोहम्मद यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या ठिकाणी जेव्हा तपासयंत्रणा तपासासाठी पोहोचल्या तेव्हा मोहम्मद यांच्या सुनेने आपल्या मुलांसह घरातच स्फोट घडविला. त्यांची दोन्ही मुले यापूर्वीच आत्मघातकी हल्ल्यात मारली गेली आहेत. या संदर्भात अटक झालेले सर्वच आरोपी अत्यंत सुसंपन्न घरातून आलेली व सुशिक्षित आहेत. मोहम्मद यांची मुले तर ब्रिटन व ऑस्ट्रेलियात जाऊन शिकून आली होती. आपल्याकडे छद्मी पुरोगामी आपल्या सेक्युलरिझमचा खोटा बुरखा फाटू नये म्हणून ज्या प्रकारचे तर्क देत असतात, त्याच्या चिंध्या करणारी ही कृत्ये आहेत. श्रीलंकेत झालेला हा हल्ला काही पहिला नव्हे आणि शेवटचा नाही. उलट याला जोपर्यंत कठोर उत्तर दिले जात नाही, तोपर्यंत अशी कृत्ये करणार्‍यांचे मनोबल वाढतच राहणार आहे. श्रीलंका त्याचा मुकाबला कसा करते ते पाहावे लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@