मुंबई : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे आजपासून तीन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन झाल्यानंतर त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या राष्ट्रीय संग्रहालयाला भेट दिली.
या संग्रहालयामुळे चित्रपट रसिकांना चित्रपटसृष्टीच्या इतिहासातले त्यांचे आवडते चित्रपट, कलाकार आणि संगीताच्या जादुई दुनियेची रंजक सफर घडेल, असे मत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केले. भारतीय चित्रपट जगात सर्वाधिक लोकप्रिय असून प्रत्येक भारतीयाला सिनेमा बघणे आवडते. त्यामुळे हे प्रभावी माध्यम सामाजिक परिवर्तनाचे साधनही बनू शकते, असेही ते म्हणाले.
चित्रपट संग्रहालयाला भेट दिल्यानंतर चित्रपट रसिकांना दर्जेदार, उत्तम, कथा दाखवून त्यांना शिक्षित आणि सक्षम करण्याचे काम चित्रपटसृष्टी करू शकते, असे मत त्यांनी फेसबुकवर शेअर केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat