बालासोर/केंद्रपाडा : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ घोषणेचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशातील सार्वजनिक सभेत भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. मोदी म्हणाले की, “यंदा राज्यात परिवर्तन होऊ घातले आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानातून तसेच जनसभेला उपस्थित असलेल्या अलोट जनसागरावरून यंदा राज्यात कमळ उमलल्याचेच दिसत आहे. म्हणूनच अटलजींच्या घोषणेचे मी आजदेखील समर्थन करतो.”
बिजू जनता दलाचे सर्वेसर्वा आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर हल्लाबोल करत मोदी म्हणाले की, “ओडिशात कमळ उमलल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि काही अधिकारी तुमच्या चौकीदाराला मिळणार्या व्यापक पाठिंब्यामुळे खवळले आहेत, भाजप कार्यकर्त्यांना ते लक्ष्य करत आहेत, पण हे जास्त दिवस चालणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ते बालासोरमध्ये मंगळवारी एका सभेला संबोधित करत होते.
नरेंद्र मोदींनी राज्यातील जनतेला आवाहन करत सांगितले की, “मी आज ओडिशातील जनतेला वचन देतो की, पाच वर्षे भारतीय जनता पक्षाला ओडिशात सेवा करण्याची संधी द्या. राज्यात गेल्या 19 वर्षांत जे झाले नाही, ते आम्ही पाच वर्षांत करून दाखवू. काही मूठभर सरकारी अधिकार्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नवीन बाबूंनादेखील मजबूर केले आहे.”
आमचा प्रयत्न आहे की, “तंत्रज्ञानाच्या वापरातून सर्वसामान्य माणसावर कोणाची खुशमस्करी करण्याची वेळ येऊ नये. भ्रष्टाचारच हा तो दानव आहे, ज्याने देशाच्या समृद्ध राज्यांपैकी एक असलेल्या ओडिशाला मजबूर ठेवले. सोबतच राज्याचा विकास करण्याऐवजी बीजेडीच्या नेत्यांनी कोळसा खाणींपासून चिट फंडातही घोटाळे केले,” अशी टीका यावेळी नरेंद्र मोदींनी केली.
‘मिशन शक्ती’चा देशाला अभिमान, महामिलावटवाल्यांना नव्हे!
बालासोरमध्ये पंतप्रधान म्हणाले की, “बालासोरचे नाव आज जगात घेतले जाते. संपूर्ण जगाने पाहिले की, या भूमीवर संपन्न झालेल्या ‘मिशन शक्ती’ने अंतराळात भारताचे मजबूत स्थान निर्माण केले. तुम्हाला अभिमान वाटला, देशालाही त्याचा अभिमान वाटला, पण खुर्चीसाठी झटापट करणार्या महामिलावटवाल्यांना त्याचा अभिमान वाटला नाही. त्यांच्यामते मोदींनी हे मिशन गुप्त ठेवायला हवे होते, असे सांगत, “तुम्हाला मजबूत सरकार हवे की मजबूर सरकार?,” असा सवाल यावेळी मोदींनी विचारला.
नवीन बाबू तुमचे जाणे निश्चित
बालासोरमध्ये जनतेशी संवाद साधण्याआधी पंतप्रधानांनी केंद्रपाडा येथेही भाषण केले. ते म्हणाले की, “ओडिशातून बीजेडी जाऊन बीजेपी सत्तेवर येणार हे निश्चित आहे. माझी इच्छा होती की, नवीन बाबूंची चांगली पाठवणी करावी, पण ज्याप्रकारे गेल्या काही दिवसांत हिंसेचा आधार घेतला गेला, ते पाहता तसे होईल, असे वाटत नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat