ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात सोमवारी दि. २९ एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदानात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ अन्वये अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने व आस्थापना वगळून सर्व दुकाने, आस्थापना, कारखाने येथील कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना पगारी सुटृी देण्यात येत आहे.
या मतदानासाठीच्या सुट्टीच्या दिवसाचा पगार कपात करण्यात येऊ नये. अत्यावश्यक सेवा दुकाने व आस्थापना वगळून सर्व आस्थापना मतदानाच्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्यात याव्यात, असे आवाहन कामगार उप आयुक्त ठाणे यांनी केले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत संबंधित आस्थापनांनी महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.
मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास आस्थापनोविरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखान्यांच्या मालकांनी, व्यवस्थापनांनी मतदानाच्या दिवशी जाहीर केलेल्या सूचनांचे योग्यरित्या पालन करण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन कामगार उप आयुक्तांच्या मार्फत करण्यात आले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat