पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची अवस्था अतिशय बिकट
इस्लामाबाद : नव्या पाकिस्तानचा नारा देणार्या इमरान खानच्या देशात अल्पसंख्याकांची अवस्था किती बिकट आहे, हे दाखविणार्या कित्येक घटना समोर येतात. आताही पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने एक अहवाल प्रकाशित केला असून, त्यातले निष्कर्ष धक्कादायक असल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तानमधील स्वतंत्र मानवाधिकार संस्थेने देशातल्या हिंदू आणि ख्रिस्ती मुलींच्या बळजबरीने केल्या जाणार्या धर्मांतर व निकाहावर काळजी व्यक्त करत सांगितले की, गेल्या एका वर्षात फक्त सिंध प्रांतात जवळपास एक हजार अशी प्रकरणे घडली.
आपल्या वार्षिक अहवालात पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने म्हणजेच एचआरसीपीने म्हटले की, “सरकारने असे जबरदस्तीने केले जाणारे निकाह रोखण्यासाठी भूतकाळात केलेले प्रयत्न अतिशय तोकडे होते. म्हणूनच आम्ही ही प्रथा बंद व्हावी, यासाठी संसदेकडे प्रभावी कायदा करण्याची मागणी करत आहोत.”
२०१8 सालातील मानवाधिकारांच्या स्थितीवर आधारित ३३५ पानांच्या या अहवालात नमूद आहे की, २०१8 मध्ये एकट्या सिंध प्रांतात हिंदू आणि ख्रिस्ती मुलींशी संबंधित जवळपास एक हजार प्रकरणे समोर आली. ज्या शहरांत सातत्याने अशाप्रकारे हल्ले केले गेले, त्यात उमरकोट, थरपारकर, मीरपुरखास, बदीन, कराची, टंडो अल्लाहया, कश्मोर आणि घोटकी यांचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये बळजबरीने केल्या जाणार्या धर्मांतराची आणि निकाहाची कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही, असे स्पष्ट करत अहवालात म्हटले की, सिंध बालविवाहविरोधी अधिनियम २०१३ ला प्रभावी पद्धतीने लागू केलेले नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat