नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार यंदा अल निनोचा प्रभाव कमी राहणार असल्याने दक्षिण-पश्चिम पर्जन्यमान सामान्य राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे यंदा पावसाची हजेरी समाधानकारक राहणार असल्याचे समजते.
कृषिप्रधान देश असल्याने भारतातील बहुतांश शेती ही पावसावरच अवलंबून आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात पाच टक्क्यांपर्यंत बदल होऊ शकतो. देशातील ७० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे. भारत तांदुळ, गहू आणि कापूस उत्पादनात जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे. पावसाच्या प्रमाणावर ही शेती अवलंबून आहे.
काय आहे अल नीनो ?
प्रशांत महासागरात पेरू देशानजीक समुद्री तटावरील उष्णतेमुळे वातावरणात होणाऱ्या बदलांना अल नीनो म्हटले जाते. गेल्या काही वर्षांत प्रशांत महासागरातील तापमानात वृद्धी होत आहे. अलनीनोमुळे समुद्रातील वाऱ्यांची दिशा बदलते. त्यामुळे पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात कमी पर्जन्यमान होते. याऊलट कमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस होते.
काय होते स्कायमेटचे अनुमान ?
स्काईमेटने दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यात सरासरी ११० टक्क्यांहून जास्त पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat