नवी दिल्ली : वित्तीय समावेशकता आणि सर्वसमावेशक विकास ही सध्याच्या काळाची गरज असल्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. अंत्योदयाचे आवाहन करतानाच विकासाचा लाभ समाजातल्या सर्वात वंचित घटकापर्यंत पोहोचला तरच खऱ्या अर्थात विकास साध्य झाला असे म्हणता येईल असे त्यांनी सांगितले. पंजाब नॅशनल बँकेच्या १२५ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते शुक्रवारी नवी दिल्लीत बोलत होते.
भारतीय बँकिंग क्षेत्रात, वाढत्या अनुत्पादित मालमत्तेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणागत सुधारणांची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यंत्रणांमधल्या काही कच्च्या दुव्यांचा आधार घेतला जाऊ नये यासाठी प्रभावी आणि सक्षम यंत्रणेची गरज असल्याचे ते म्हणाले.
वित्तीय समावेशकता आणि सर्वसमावेशक विकासासाठीच्या भारताच्या प्रयत्नात बँकांची महत्वाची भूमिका आहे. वाढत्या अनुत्पादित मालमत्ता यासारख्या आव्हानांचा त्यांनी उल्लेख केला. कर्जाच्या मंजुरीपूर्व आणि मंजुरीपश्चात प्रक्रियेवर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी बँकांना केल्या. बँकांनी निधीवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी अंतर्गत प्रक्रिया बळकट करावी आणि कर्ज देताना कठोर शिस्तीचे पालन करावे असेही उपराष्ट्रपतींनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat