नांदेड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केल्याबद्दलची भूमिका नांदेड येथील सभेत स्पष्ट केली. नरेंद्र मोदींबद्दल माझ्या मनात प्रचंड राग आहे, त्यांनी भारतातील जनतेचा केसाने गळा कापला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मी प्रचार करत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राज म्हणाले, "मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे, त्याच्या समस्या संपलेल्या नाहीत. मात्र, नरेंद्र मोदी त्याबद्दल काही बोलत नाहीत. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुण गाव सोडून जात आहेत, अच्छे दिन कुठे आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यभर मोदींविरोधात प्रचार सुरू केला आहे. शुक्रवारी नांदेडमध्ये राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली या सभेत त्यांनी मोदींवर घणाघाती टीका केली आणि मोदींनी देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.
· काय म्हणाले राज ठाकरे ?
· मी कोणत्याही पक्षाचा प्रचार करत नसून मोदी शाह यांचे नाव राजकारणाच्या क्षितीजावरून काढून टाकण्यासाठी सभा घेत आहे.
· मतदारांनो गाफील राहू नका, असे आवाहन त्यांनी केले.
· जवानांच्या देशसेवेचा राजकीय लाभ घेण्याचा भाजप प्रयत्न करत आहे.
· राज्यातील महिलांवर अजुनही अत्याचार होत आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat