एक तरफ बंदूकें दनदन, एक तरफ थी टोलियाँ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2019
Total Views |



ठीक १०० वर्षांपूर्वी याच दिवशी पंजाबच्या जलियाँवाला बागेत जमलेल्या जवळपास १० हजार नि:शस्त्र भारतीयांवर जनरल डायरच्या आदेशानुसार ब्रिटिश सैनिकांनी बेछूट गोळीबार केला. आज या घटनेच्या शताब्दीनिमित्ताने त्या हुताम्यांचं पुण्यस्मरण करूया.

 

दि. १३ एप्रिल, १९१९. दुपारी एक विमान अमृतसर शहरावरून चक्कर मारून गेलं. पंजाबच्या बैसाखी सणाचा तो दिवस होता. खुद्द शहरातले आणि आजूबाजूच्या परिसरातले हजारो स्त्री-पुरुष अमृतसरच्या प्रख्यात सुवर्ण मंदिरात येत-जात होते. तिथून जवळच असलेल्या जलियाँवाला बाग (जालियनवाला बाग हा चुकीचा, भ्रष्ट इंग्रजी उच्चार) या मैदानाकडे सरकत होते. संध्याकाळी ४.३० वाजता तिथे एक सभा होणार होती.

 

अमृतसरचा मिलिटरी कमांडंट कर्नल (तात्पुरता ब्रिगेडिअर जनरल) रेजिनाल्ड डायर हे वृत्त ऐकून खवळला. त्याने सकाळीच शहरात संचारबंदी जारी केली होती. बैसाखी सणाला अमृतसरला घोड्यांचा आणि गुरांचा मोठा बाजार भरायचा. दुपारी १ वाजता डायरच्या सैनिकांनी तो बाजार बंद करायला लावला. साहजिकच तिथले रिकामे लोकही जलियाँवाला बागेकडे वळले. गुप्तचरांकडून डायरकडे सूचना येऊ लागल्या की, हजारो हिंदू, मुसलमान आणि शीख लोक जलियाँवाला बागेत गोळा झाले आहेत. वातावरण तप्त आहे. जमलेल्या लोकांची गर्दी नेमकी कितीशी आहे, याचा अंदाज घेण्यासाठी डायरने चक्क विमान पाठवलं.

 

ठरल्याप्रमाणे ४.३० वाजता सभा सुरू झाली. संतापलेला डायर ९० सैनिकांनिशी तिथे येऊन पोहोचला. ५० सैनिकांकडे ‘३०३ ली एनफिल्ड’ रायफल्स होत्या. (नंतर त्या बंदुकीला ‘थ्री-नॉट-थ्री’ म्हणू लागले.) शिवाय त्याच्याबरोबर दोन चिलखती गाड्या होत्या नि प्रत्येकीत एकेक मशीनगन होती. जलियाँवाला बाग ही जागा सर्व बाजूंनी तीन ते चार मजली इमारतींनी वेढलेली आणि मध्ये सुमारे सहा ते साडेसहा एकर मोकळं मैदान अशा स्वरूपाची होती. त्या मैदानात एक विहीरही होती. सुवर्ण मंदिरापासून अगदी जवळच ही बाग आहे. डायरच्या ताफ्यातल्या चिलखती गाड्यांना जलियाँवाला बागेकडे जाणार्‍या अरूंद गल्लीतून आत शिरता येईना. म्हणून त्यांना तिथेच थांबवून नाकाबंदी करण्यात आली. स्वत: डायर आणि अमृतसर शहराचा डेप्युटी कमिशनर आयर्व्हिंग ५० बंदूकधारी सैनिकांसह बागेत शिरले. समोर किमान १० हजार नि:शस्त्र लोक शांतपणे भाषण ऐकत होते. पोलीस किंवा सैनिक यांनी जमावाला कसे हाताळावे याचे काही संकेत आहेत. प्रथम तोंडी सूचना द्यायच्या असतात. त्या पाळल्या न गेल्यास लाठीमार आणि त्याचाही उपयोग न झाल्यास गोळीबार असे टप्पे असतात. गोळ्याही जमावाच्या खालच्या बाजूला झाडायच्या असतात. म्हणजे जमाव जखमी व्हावा, त्याला जरब बसावी, पण शक्यतो माणस मरू नयेत.

 

डायरने यातील काहीही न करता सरळ हुकूम दिला,‘फायर.’ युद्धात, युद्धासाठी वापरल्या जाणार्‍या बंदुका दणादण वाजू लागल्या. समोरच्या किमान १० हजार लोकांच्या हातात मात्र कोणतेही शस्त्र नव्हतं. अखंड १० मिनिटं अविरत गोळीबार सुरू होता. काडतुसं संपली तेव्हाच गोळीबार बंद झाला. असा हा प्रचंड पराक्रम गाजवून डायर आणि आयर्व्हिंग आपल्या शिबंदीसह निघून गेले. नशीब एवढंच की, गाडीत असणार्‍या मशीनगन्स अरूंद रस्त्यामुळे आत नेता आल्या नाहीत; अन्यथा त्याने मुडद्यांच्या राशीच रचल्या असत्या. स्वत:ला ‘सुधारलेले’, ‘प्रागतिक’, ‘आधुनिक’ वगैरे म्हणवून घेणार्‍या या इंग्रजांची मनोवृत्ती मध्ययुगीनच होती. ‘प्रतिपक्षाला नामोहरम करायचंय ना, मग बेछूट कत्तल करा, त्याशिवाय त्यांना कळायची नाही आपली ताकद!’ मध्ययुगात याच मनोवृत्तीतून चंगेजखान, तैमूरलंग, नादिरशहा यांसारख्या कत्तलबाजांनी शत्रूच्या मुडद्यांचे मनोरे रचले नि रक्तामांसांचा चिखल केला. ‘जलियाँवाला बाग हत्याकांड’ प्रत्यक्ष घडवणारा रेजिनाल्ड डायर आणि त्याला अशी काहीतरी जबरदस्त कारवाई करण्याची प्रेरणा देणारा पंजाब प्रांताचा गव्हर्नर सर मायकेल ओडवायर या दोघांची मनोवृत्ती तशीच होती.

 

अमृतसरच्या या भयंकर हत्याकांडाच्या बातम्या भारतभर पोहोचल्या आणि दु:ख-संतापाचा एकच कहर उसळला. अमृतसरचा सिटी सिव्हिल सर्जन, जो स्वत:च एक इंग्रज होता, तो मृतांचा आकडा एक हजार सांगत असताना, सरकार मात्र अधिकृतपणे ३०० लोक मृतं असं म्हणत होते. स्वामी श्रद्धानंदांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्रात १५०० मृतं असं म्हटलं होतं. वृत्तपत्रांमधून आणि सभांमधून ओडवायर, डायर आणि एकंदरीतच इंग्रज सरकारविरुद्ध प्रचंड गदारोळ झाला. ब्रिटिश संसदेत या विषयावर जोरदार चर्चा झाली. खुद्द युद्धमंत्री विन्स्टन चर्चिल याने भारत सरकारच्या या कृत्याची ‘सैतानी कृत्य’ या शब्दांत संभावना केली. परिणामी, डायरला सैन्यातून बरखास्त करण्यात आलं आणि ओडवायरलाही इंडियन सिव्हिल सर्व्हिसमधूून काढून मायदेशी बोलावण्यात आलं. मात्र, याखेरीज आणखी कसलीही कारवाई त्या दोघांवरही करण्यात आली नाही. साहजिकच सत्तेचा माज चढलेले ते दोघेही जण, ‘आम्ही जे काही केले ते ब्रिटिश साम्राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्यच होते,’ असंच म्हणत राहिले. त्यातही मायकेल ओडवायर हा जास्त उर्मट आणि माजुर्डा होता. १३ एप्रिलच्या घटनेत देशभर प्रचंड अस्वस्थता होती. दोनच दिवसांनी म्हणजे १५ एप्रिल, १९१९ रोजी पंजाब प्रांतातच गुजरानवाला या शहरात दंगा सुरू झाला. ओडवायरने सरळ ‘रॉयल एअर फोर्स’ला पाचारण केलं आणि सांगितलं, “विमानातून मशीनगन्स चालवा. तेवढ्याने भागलं नाही, तर दंगेखोरांवर बॉम्ब टाका.” वायुदलाने हुकूमाची अंमलबजावणी केली. १२ जण ठार झाले नि २७ जखमी झाले. हेदेखील सरकारी आकडे आहेत.

 

परंतु, रेजिनल्ड डायर आणि मायकेल ओडवायर यांचा हा मुजोरपणा आणि संताप मुळात एका भयातून निर्माण झाला होता. ते भय म्हणजे भारतात इंग्रजी राजवटीविरुद्ध १८५७ सालाप्रमाणे काहीतरी जबरदस्त क्रांती होणार आहे, अशी चाहूल त्यांना लागली होती. १८५७ची क्रांती दडपून टाकल्यावर इंग्रजांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’चं बाहुलं बाजूला करून रीतसरपणे भारताचा राज्यकारभार ब्रिटिश पार्लमेंटच्या हाती घेतला. एक अत्यंत बलवान आणि सूक्ष्म असं राज्ययंत्र स्थापित करून त्यांनी पुढची ४०-४५ वर्षं भारताची मनोसक्त लूट केली. पण, हे सदासर्वकाळ जमेल याची त्यांना शाश्वती वाटेना. १९०५ साली व्हाईसरॉय कर्झनने बंगालची फाळणी याचसाठी तर केली. पण, तो उद्योग चांगलाच अंगाशी आला. आतापर्यंत असंघटित असलेला भारत उलट वेगाने संघटित होऊ लागला. इंग्रजांच्या दृष्टीने डोकेदुखी असणारे महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब, हे प्रांत तर भलतेच सक्रिय झाले. अखेर १९११ मध्ये इंग्रजांना झक मारत बंगालची फाळणी रद्द करावी लागली. यामुळे उत्साहीत झालेल्या क्रांतिकारकांनी १९१२ साली खुद्द व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंजवर बॉम्ब फेकला. पंजाबचे लाल हरदयाळ आणि बंगालचे रासबिहारी बसु हे युरोप-अमेरिकेतून काहीतरी जबरदस्त क्रांतियुद्ध पेटवण्याच्या प्रयत्नात असल्याचा बातम्या इंग्रजांना त्यांच्या गुप्तहेरांकडून मिळत होत्या.

 

तेवढ्यात म्हणजे १९१४ साली युरोपात महायुद्ध पेटलं. या युद्धात भारतीय क्रांतिकारक जर्मनी-तुर्कस्तान यांना मदतीला घेऊन अफगाणिस्तानमार्गे भारतावर लष्करी हल्ला करण्याचीही शक्यता इंग्रजांना वाटत होती. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी १९१५ साली इंग्रजांनीडीफेन्स ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९१५’ नावाचा एक कायदा पारित करुन घेतला. कोणाही व्यक्तीला बिनावॉरंट अटक करण्याचा आणि बिनाचौकशी कितीही काळ तुरुंगात डांबून ठेवण्याचा अधिकार या कायद्याने सरकारला मिळाला. १९१८ साली महायुद्ध संपलं. जर्मनी-तुर्कस्तान पराभूत झाले. पण, भारतीय क्रांतिकारकांची ‘गुप्त गदर पार्टी’ म्हणजे ‘क्रांतिपक्ष’ याच्या कारवाया थांबेनात. ‘गदर’वाले भारतीय सैन्यात उठाव घडवून आणणार, अशा खबरा इंग्रजांना मिळू लागल्या. याचा बंदोबस्त करण्यासाठी न्यायाधीश सर सिडने रौलेट याच्या कमिशननेडीफेन्स ऑफ इंडिया अ‍ॅक्ट - १९१५’ मध्ये आणखी काही कडक नियम लावले. १९१९च्या मार्चमध्ये हा नवा ‘रौलेट अ‍ॅक्ट’ लागू झाला. त्याच्या विरोधात देशभर कडक हरताळ आणि निदर्शने झाली. पंजाब प्रांतात ‘रौलेट अ‍ॅक्ट’विरोधी निदर्शन करणारे काँग्रेसचे दोन मान्यवर नेते सत्यपाल आणि डॉ. किचलू यांना सरकारने पकडलं आणि अज्ञातस्थळी अटकेत ठेवलं. वातावरण त्यामुळे अधिकच तापलं. येत्या बैसाखी सणाला प्रांतभर काहीतरी जबरदस्त घडणार, १८५७ सारखी क्रांतीदेखील होऊ शकते, अशा खबरा गुप्तचरांकडून मिळत गेल्यामुळे बहुधा ओडवायर आणि डायर आणखी... आणखी पिसाटत गेले. इंग्रजी साम्राज्याविरुद्ध बंड करण्याची हिंमत करतात हे भारतीय? दाखवूयाच यांना इंग्रजी साम्राज्याची ताकद! म्हणजे बंड होण्याचं भय स्वत:च्या शक्तीचा माज आणि गुलाम भारतीयांबद्दलची जन्मजात तुच्छता यांतून ही कृती घडली.

 

कवी प्रदीप यांच्या शब्दांत आपण त्या हुताम्यांचं पुण्यस्मरण करूया-

जलियाँवाला बाग ये देखो,

यही चली थी गोलियाँ ।

एक तरफ बंदूके दनदन, एक तरफ थी टोलियाँ ।

मरनेवाले बोल रहे थे, इन्कलाब की बोलियाँ।

यहाँ लगा दी बहनो ने भी बाजी अपनी जान की।

इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की

वंदे मातरम । वंदे मातरम । वंदे मातरम ।

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@