नवी दिल्ली : जागतिक बँकेनंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही भारताच्या विकासदराबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. भारतात चालू आर्थिक वर्षात विकासाचा ७.३% तर पुढील आर्थिक वर्षात विकासदर ७.५% राहील, असा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमाणे गेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर चीनच्या तुलनेत जवळपास अर्धा टक्का अधिक राहिल्याचंही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सांगितले आहे.
येत्या काळात भारताच्या आर्थिक विकासाचा दर वेगवान राहण्यामागे खासगी आणि सरकारी क्षेत्रातून झालेली मोठ्या प्रमाणातील गुंतवणूक तसेच अर्थव्यवस्थेत सातत्याने टिकून असलेली दमदार मागणी अशी दोन प्रमुख कारणे आहेत.
पुढची तीन ते पाच वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सरासरी ७ टक्के दराने विकासाच्या मार्गावर टिकून राहील, असे भाकितही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवले आहे. दरम्यान, सरकारवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी आर्थिक क्षेत्रातील पायभूत धोरण बदलांचा सिलसिला कायम राखणे भारतासाठी आवश्यक असल्याचेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे .
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat