मुंबई : ‘तुला पाहते रे’, ‘भाभीजी घर पर है’, ‘तुझसे है राबता’ आणि ‘कुंडली भाग्य’ या मालिकांच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या मालिकांमधून केंद्र शासनाच्या योजनांचा प्रचार करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार काँग्रेसने केली होती. याची दाखल घेत आयोगाने या मालिकांच्या निर्मात्यांना २४ तासात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
‘तुला पाहते रे’ या मालिकेमधून ‘मेक इन इंडिया’चे तर ‘भाभीजी घर पर है’ मालिकेतुन उज्ज्वला योजनेचे प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. यासोबतच ‘तुझसे है राबता’ आणि ‘कुंडली भाग्य’ या मालिकांमधूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विविध योजनांचा प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याचा एक व्हिडीओ ट्विट करत भाजप आचारसंहितेचा भंग करत असल्याचा आरोप केला आहे.
या तक्रारींची दखल मुख्य निवडणूक कार्यालयाने घेतली आहे. असा प्रचार करणाऱ्या या दोन्ही वाहिन्यांवरील संबंधित मालिकांच्या निर्मात्यांना चोवीस तासात त्यांचे म्हणणे मांडण्यास या नोटिसीद्वारे सांगितले आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही आयोगाकडून करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat