पण मन मानत नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Apr-2019
Total Views |



जगातील प्रत्येक व्यक्तीची एक स्वत:ची अशी ओळख असते. म्हणूनच ‘मै ऐसा क्यु हूं?’ हा प्रश्न आपल्या सगळ्यांना वेळोवेळी पडतो. इतर लोकं ज्या गंभीर गोष्टी सहज झेलतात, ते आपल्याला का पेलत नाहीत, हा जटील प्रश्न मानसशास्त्राने खूप वेळा घुसळला आहे. पण, त्याचे अमूक उत्तर मिळालेले नाही आणि मिळणारही नाही.


आजच्या आधुनिक युगात आपण पाहतो की, आपली शारीरिक व मानसिक आरोग्याची घडी विस्कटलेली आहे. ऐहिक आकांक्षा व मानसिक शांतीचे गणित अजिबात जुळत नाही. मानसिक आरोग्याची कल्पना तशी पाहिली तर तुलनात्मक आहे. अमूक एखादी गोष्ट मिळाली म्हणजे एखादी व्यक्ती सुखी झाली असे म्हणता येणार नाही. तसेच संकटाचा पहाड कोसळला म्हणून सगळ्याच व्यक्ती आयुष्यभर दुःखाच्या गुहेत लुप्तही होत नाहीत. किंबहुना, कितीही कठीण परिस्थितीत मन शांत ठेवून यशाची शिखरे गाठणारी माणसे या जगात आहेतच, तर अत्यंत पोषक परिस्थिती आहे, कुठलीही कठीण समस्या नाही तरी, रसातळाला जाणारी माणसेही याच पृथ्वीतलावर आहेत. एकंदरीत फ्रॉईडसारखे मानसशास्त्रज्ञ मनाची गुंतागुंत व कार्यक्षमता या सुप्त मनातील कार्यपद्धतीवरून वर्णन करतात. सुप्त मनातून येणाऱ्या जाणिवा, दबलेल्या इच्छा व त्यामुळे व्यक्त होणारे विशिष्ट आचारविचार याचा ऊहापोह मनोविश्लेषणातून बऱ्याच वेळा केला जातो. स्वप्नातील अनेक रेखाटनामुळे मनात काय चालले आहे? किंवा मनात कुठल्या क्लिष्टता आहेत याचे विश्लेषण केले जाते. मुळात मन कुठे आहे, हे सांगतानाच सामान्य माणसांचा गोंधळ उडतो. खरं ज्याला आपण ‘मनातून’ म्हणतो त्या ‘दिल से’ किंवा ‘हृदयातून’ येतात असे समजले जाते. पण, मानसिक आरोग्याविना खरे आरोग्य नाही हे खरे. मानसिक आरोग्य हे आपल्या मानसिक प्रगल्भतेचे प्रतीक आहे. आपल्या वैयक्तिक व सामाजिक सक्षमतेतून जास्तीत जास्त समाधान कसे मिळेल. स्वस्थचित्त व स्थिरचित्त मन कसे लाभेल, याचा विचार प्रत्येकजण कधी ना कधी आणि विशेषत: भावनांचा उद्रेक झाल्यावर करीत असतो. बहुतांशी एखाद्या व्यक्तीला स्वत:बद्दल आत्मविश्वास असतो, आदर असतो आणि स्वत:च्या अस्तित्वाबद्दलही एक प्रकारचे सशक्त प्रेम असते. तेव्हाच त्या व्यक्तीला आपण मानसिकदृष्ट्या सक्षम म्हणू शकतो. मानसिक आरोग्याची संकल्पना ही माणसाच्या अस्तित्वाइतकीच पुरातन आहे. आपली मानसिक आरोग्याबद्दलची जागृती, रोगाबद्दलची माहिती आपल्या पुरातन ग्रंथांमध्येही आढळते. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता यासारख्या आयुर्वेदिक ग्रंथातही मानसिक आरोग्याची संकल्पना वर्णन केलेली आहे. मुळात मानसिक आरोग्य वा रोगाबद्दल पाश्चात्य संकल्पना व आशियाई संकल्पना या विविध पद्धतीने जोपासल्या आहेत. अथर्ववेदात मानसिकरोगांची व त्यावरील उपचारांची माहिती सखोल रूपातही दिलेली आहे. अथर्ववेदात सांगितल्याप्रमाणे, मानसिक आरोग्य हे सत्त्व, रजस व तमस या तीन गुणांत जोपासलेले आहे.

 

मनाची लिला अगाध आहे. मनाचे खेळ कल्पनांच्या पलीकडचे आहेत. आपण द्वेषाच्या भोवऱ्यात का अडकतो? आंधळ्या प्रेमात घरदार का सोडतो? कळत असतानासुद्धा चुकीचे निर्णय का घेतो? भावनांचा कल्लोळ आपल्या मनात कसा उठतो? अनेक चांगल्या गोष्टींचे महत्त्व आपल्याला का पटत नाही? आपण इतके मूर्खासारखे कसे वागतो? आयुष्य एकच आहे, हे आपल्याला माहिती आहे. ते संपूर्ण जगले पाहिजे व तेही आनंदाने जगले पाहिजे हेही बुद्धीला पटते. पण, आपण तरीही दुःखीकष्टीहोत राहतो. मानसिक आरोग्याकडे पाहताना एखाद्या व्यक्तीचा स्वत:चा स्वत:शी आणि समाजाशी संवाद महत्त्वाचा आहे. हा संवाद सुसंवाद आहे का विसंवाद आहे, यावर त्याचा आशावाद व दैनंदिन जीवनातील आनंद अवलंबून आहे. आपण आपल्या आयुष्यातील तणावाशी कसे झुंजणार? आपली विधायकता कशी जोपासणार? आंतरिक शांती कशी मिळविणार, या सामान्य स्वास्थाशी निगडित असणाऱ्या गोष्टी आहेत. आयुष्यातील आनंद किंवा स्वास्थ्य हे माणसाच्या एककल्ली अस्तित्वावर अवलंबून नसते. तो कितीही यशस्वी असला किंवा त्याच्याकडे कितीही संपत्ती असली तरी, त्याला एकट्याला जगणे कठीण असते. म्हणजेच त्याने जगाशी प्रगल्भ तडजोड केली आहे आणि ती कशी केली आहे हे महत्त्वाचं आहे. अशा प्रगल्भ तडजोडी करणाऱ्या व्यक्ती पहिल्यांदा आपल्या मनाशी प्रामाणिक असतात. त्यांना आपणास काय हवे आणि काय नको हे काही अंशी तरी कळलेले असते. त्याचवेळी या व्यक्तींची सामाजिक परानुभूती त्यांना समाजाप्रति संवेदनशील बनविते. व्यक्तीच्या विचारभावना व त्या अनुषंगाने त्यांची इतरांशी वागायची पद्धत, व्यावहारिक दृष्टिकोन या गोष्टी शास्त्रीय पार्श्वभूमीवर आधारित आहेत आणि तरीही त्या मोजता-मापता येत नाहीत. कारण, त्या खळखळणाऱ्या आहेत. समुद्राच्या प्रत्येक लाटेची उंची वेगळी असते. तसेच जगातील प्रत्येक व्यक्तीची एक स्वत:ची अशी ओळख असते. म्हणूनच ‘मै ऐसा क्यु हूं?’ हा प्रश्न आपल्या सगळ्यांना वेळोवेळी पडतो. इतर लोकं ज्या गंभीर गोष्टी सहज झेलतात, ते आपल्याला का पेलत नाहीत, हा जटील प्रश्न मानसशास्त्राने खूप वेळा घुसळला आहे. पण, त्याचे अमूक उत्तर मिळालेले नाही आणि मिळणारही नाही. मनातील विचार, भावना, आपली वागणूक यातून घडणारे आपुले आयुष्य यातून कितीतरी प्रश्न आपल्यासमोर उभे ठाकतात. त्यांची उत्तरे पुरी हयातभर आपल्याला सापडत नाहीत. सारे कळते हो पण मन मानत नाही...

 

-डॉ. शुभांगी पारकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@