मुंबई : "नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री किंवा कोणताही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या कथित टिप्पणीच्या बातम्या वाचून आश्चर्य वाटले." असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी मुंबईत केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये आणि अमरजीत मिश्रा उपस्थित होते.
तावडे म्हणाले की, "कोणत्याही गुन्ह्यामध्ये मुख्यमंत्री किंवा मंत्री तपास करीत नसतो आणि अशा तपासामध्ये हस्तक्षेप न करण्याचा नियम आहे. दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास सीबीआय, एसआयटी आणि कर्नाटक एसआयटी एकत्र करत आहेत. या सगळ्या कामात सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही. उच्च न्यायालयाच्या कथित टिप्पणीनंतर माध्यमांकडून ज्या बातम्या दिल्या जात आहेत त्याचे आश्चर्य वाटते." उच्च न्यायालयाकडून लिखित ऑर्डर आल्यावरच अधिक भूमीका स्पष्ट करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat