‘पवन करे शोर’
सन २०१९ ची लोकसभा निवडणुकीतील मतदानयंत्रावरील उमेदवार यादी म्हणजे नाशिककर जनतेसाठी पोलीस दरबारी असणारी ‘वॉण्टेड लिस्ट’ असेल का, असा प्रश्न सध्या पडतो आहे. कारण, या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे पवन पवार यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. राजकीय आखाड्यात उतरून त्यांना पतित करण्याचा घाट वंचित आघाडीच्यावतीने येथे घालण्यात आलेला दिसतो. भीमा-कोरेगाव घटनेनंतर राज्यभर काही हिंसक प्रतिक्रिया उमटल्या, त्यात नाशिकमधील जेलरोड परिसरात उमटलेल्या प्रतिक्रियेचे जनक म्हणजे हे वंचित आघाडीचे हे पवन पवार... गल्लीच्या तोंडावर बसून भाईगिरी करणे, धमकविणे, हल्ला करणे, खंडणी मागणे यांसारखे अनेकविध ‘उद्योग’ करून आपली उपजीविका साधणारे उमेदवार देऊन वंचित आघाडीने सद्सद् विवेक, सदाचार, शालीनता यांसारख्या मानवी गुणांनाच उमेदवार निवडीत ‘वंचित’ ठेवले आहे की काय, असा प्रश्न पडतो. त्यामुळे असे उमेदवार खरंच खासदार म्हणून निवडून आले, तर त्या मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे ज्यांच्या कार्याची पद्धतच मुळात असंविधानिक आहे, असे हे लोकप्रतिनिधी बनून मिरवण्याची स्वप्ने रंगवणारे संविधानिक पद्धतींत कसे नैतिक, कायदेशीर कामकाज पार पडणार, हा प्रश्न वंचितांच्या नेतृत्वाला उमेदवारी देताना का पडला नाही, हे एक मोठे कोडेच आहे. जनसामान्यांना न्याय देणारे, खर्या अर्थाने बहुजन समाजास दिशा देणारे आणि त्यांची बाजू शासन दरबारी पोटतिडकीने मांडणारे अनेक उमेदवार वंचित आघाडीला नाशिकमधून मिळाले असते. बहुजन समाजाच्या अनेक नेत्यांनी तशी समस्त नाशिकरांचे प्रश्न मांडण्याची परंपरादेखील नाशिकला आहेच. मात्र, केवळ ‘ठोकशाही’ला मानणारे आणि ‘लोकशाही’चा स्वत:ला हवा तो अर्थ काढणारे पवन पवारांसारखे उमेदवार का दिले, हाच मोठा प्रश्न यानिमित्ताने अधोरेखित होतो. त्यामुळे सध्या ‘सावन का महिना’ नसला तरी नाशिकमध्ये हा ‘पवन’ मात्र जोरदार ‘शोर’ करतोय. पण, नाशिकची हवा पाहता, मतदारही आपल्या मतपेटीतून हा ‘पवन’ ‘वंचित’ करतील की काय, असे म्हणायला वाव आहेच.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat