नवी दिल्ली : भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर शंका उपस्थित करत पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या सॅम पित्रोदा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला आहे. 'विरोधक भारतीय लष्कराची सतत बदनामी करत आहेत. विरोधकांकडून होत असलेल्या वक्तव्यांबाबत भारतीय नागरिकांनी त्यांना जाब विचारायला हवा', असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. "विरोधक करत असलेल्या माकडचेष्टांना जनता कदापि विसरु शकणार नाही आणि त्यांना यासाठी माफीही केली जाणार नाही, असे म्हणत त्यांनी पित्रोदा यांच्यावर निशाणा साधला.
भारतीयांचा लष्करावर संपूर्ण विश्वास असल्याचेही मोदी यांनी ट्विट केले आहे. "भारतीय हवाई दलाने ३०० लोकांना मारले असेल तर याचे पुरावे दिले जातील का?," असा सवाल पित्रोदा यांनी उपस्थित केला आहे. काही लोक येऊन हल्ला करतात त्याला संपूर्ण देश कसा जबाबदार, असा प्रश्न उपस्थित करत कॉंग्रेस नेते सॅम पित्रोडां यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची पाठराखण केली आहे. पुलवामा हल्ल्यावर भाष्य करताना पित्रोडांनी हा प्रश्न उपस्थित केला. या वक्तव्याचा समाचार घेत मोदींनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat