नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ६ वैज्ञानिकांना संशोधनातील कार्यासाठी ‘शांती स्वरूप भटनागर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी प्रदान करण्यात आला. येथील विज्ञान भवनात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्यावतीने ‘शांती स्वरूप भटनागर’ या प्रतिष्ठीत पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात २०१६, २०१७, २०१८ साठीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डॉ. थॉमस पुकाडिल, डॉ. अमित अग्रवाल, डॉ. अमलेन्दु कृष्णा, डॉ. अमित दत्त, डॉ. जी. नरेश पटवारी, डॉ. अश्विन अनिल गुमास्ते यांना या ‘शांती स्वरूप भटनागर’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रूपये रोख, प्रमाणपत्र असे आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदचे संचालक शेखर सी. मांडे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुरस्कार्थी वैज्ञानिकांचा अल्पपरिचय
पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे डॉ. थॉमस पुकाडिल यांनी औषधांमध्ये असणा-या महत्वपुर्ण घटकांविषयी यशस्वी संशोधन केले आहे. त्याबद्दल त्यांना ‘जैव विज्ञान’ यासाठी वर्ष २०१८ चा ‘शांती स्वरूप भटनागर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईतील भारतीय प्रौद्योगिक संस्थेचे डॉ. अमित अग्रवाल यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात सौध्दांतिक आणि संख्यात्मक संशोधन केल्याबद्दल ‘अभियांत्रिकी विज्ञान’ यासाठी वर्ष २०१८ साठीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. यासोबतच आयआयटी मुंबईचे डॉ. अश्विन अनिल गुमास्ते यांनाही वर्ष २०१८ साठीच ‘अभियांत्रिकी विज्ञान’ या गटात पुरस्कृत करण्यात आले. त्यांनी राष्ट्रीय पायाभुत सुविधेमध्ये अण्ड टू अण्ड करीयर क्लास नेटवर्किंग आणि करीयर इथरनेट स्विच राऊटर्सचा विकास केला.
मुंबईतील टाटा मुलभुत संशोधन संस्थेचे डॉ. अमलेन्दु कृष्णा यांना त्यांनी अतियाह-सैगल कम्प्लीशन थीअरेमच्या सृदश प्रमाण के-थ्योरी आणि ब्लॉच-श्रीनिवास गृहीतके मांडण्यासाठीच्या कार्याबद्दल वर्ष २०१६ च्या ‘गणित विज्ञान’ साठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ. अमित दत्त यांना अनुवांशिक कर्करोग, विशेषत: भारतीयांना होणारा कर्करोग, फुफ्फुस कर्करोगाविषयी केलेल्या संशोधनासाठी ‘वैद्यकिय विज्ञान’ या गटातील वर्ष २०१७ साठीचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईतील भारतीय प्रौद्योगिक संस्थेचे डॉ. जी. नरेश पटवारी यांना ‘रसायन विज्ञान’ यासाठी वर्ष २०१७ चा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गैस फेजमध्ये कंपनीय स्पेक्ट्रोस्कोपी संबंधित विषयात महत्वुपर्ण प्रयोग त्यांनी केले. यामुळे हायड्रोजन आबंधन संबंधित मुळ संकल्पनांमध्ये भर पडली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat