मुंबई : रविवारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. त्यानंतर सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहू लागले. १०वी,१२वीच्या परीक्षा आणि निवडणुकीची कामे असे दुहेरी ओझे शिक्षकांवर पडणार होते. त्यामुळे शिक्षक संघटनेने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्यानंतर "बोर्डाचे पेपर तपासणाऱ्यांना निवडणुकांचे काम देऊ नका." असे आदेश निवडणूक अधिकारी अ. ना. वळवी यांनी दिले आहेत.
दहावी-बारावीचे परीक्षा सध्या सुरु आहे. शिवाय परीक्षा झाल्यावर पेपर तपासण्याचे कामही या शिक्षकांकडे असते. असे असताना तब्बल ५० हजारापेक्षा जास्त शिक्षकांना निवडणुकीचे काम दिले जाणार होते. त्यामुळे विविध शिक्षक संघटनांनी दहावी आणि बारावीचे पेपर तपासणी आणि निकालासंदर्भातील कामात शिक्षक व्यस्त असल्याने निवडणुकीची ड्यूटी देऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती.
निवडणूक आयोगाचे उपसचिव आणि सह मुख्य निवडणूक अधिकारी ए.एन वळवी यांनी परिपत्रक काढून सर्व जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत. परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना कामातून वगळावे, असे आदेश निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या आदेशामुळे राज्यातील ५० हजाराच्या वर शिक्षकांना दिलासा मिळणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat