प्रेमाची भाषा अशी कशी?
स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टीका, हा राहुल गांधींचा आजकालचा आवडता छंद बनला आहे. सावरकरांनी ब्रिटिशांची ९ वेळा माफी मागितली आणि काँग्रेस नेत्यांनी मात्र कधी कुणापुढे मान झुकवली नाही, हे गेल्या वर्षभरात राहुल यांनी जवळपास दहा-बारावेळा सांगून झाले असेल. काँग्रेसची (नेहरू-गांधी घराण्याची?) प्रेमाची विचारधारा बहुधा त्यांना असे करायला शिकवत असावी. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि आज २०१९ मध्ये देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, अनेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हे संघस्वयंसेवक आहेत. इतर अनेक क्षेत्रांत संघस्वयंसेवकांनी भरीव योगदान दिले आहे. संघ काळानुरूप बदलत राहिला, नव्या सकारात्मक गोष्टी शिकत, अंगीकारत पुढे जात राहिला. यासाठी आपल्या कट्टर विरोधकांशी संवाद साधायला संघाने कधीच कमीपणा वाटून घेतला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी राष्ट्रपती नुकतेच संघाच्या व्यासपीठावर येऊन गेले. संघाची विचारधारा मानणारे वगैरे नाहीत उलट विरोधकच आहेत, असे अनेकजण गेल्या ९ दशकांत संघ व्यासपीठांवर येऊन गेले. वैचारिक आदानप्रदान घडून आले. प्रणव मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमात जाण्यास काँग्रेसमधूनच तीव्र विरोध झाला. उलट संघाने मुखर्जींचे स्वागत केले, त्यांचा सन्मान केला. तरीही, काँग्रेस अध्यक्षांसाठी मात्र ही द्वेषाची विचारधारा ठरते. राहुल गांधींच्या आज्जी इंदिराबाईंनी सावरकरांना ‘भारताचे असामान्य पुत्र आणि ब्रिटिशांना धाडसी आव्हान देणारे वीर’ असे संबोधले होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी सावरकरांचा उल्लेख ‘देशभक्त आणि स्वातंत्र्यसेनानी’ असा केला. तथापि, राहुल गांधींना काही इंदिरा आणि मनमोहन सिंग यांचे विचार पटत नसावेत. त्यामुळे सावरकरांनी ब्रिटिशांची ९ वेळा माफी मागितली, हे वेडेवाकडे चाळे करून पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. भाजपवाले इतिहासातील महापुरुषांवर चिखलफेक करत आहेत, पं. नेहरूंची बदनामी करत आहेत वगैरे आरडाओरडा करणार्या पुरोगामी-लिबरलांना राहुल यांची सावरकरांबद्दलची ही प्रेमाची भाषा मात्र दिसत नसावी. असो. या कथित प्रेमाची भाषा किती खरी, किती खोटी, हे देशातील सुज्ञ जनता लवकरच स्पष्ट करेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat