बिचारी विजयाशांती..
काँग्रेसच्या काळात अभिनयाचे खोऱ्याने पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री विजयाशांती काँग्रेसची नेताही आहे. तर या विजयाशांतींना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती वाटते. “पंतप्रधान दहशतवाद्यांसारखे दिसतात आणि त्यांनी लोकशाहीची हत्या केली,” असेही विजयाशांती म्हणाल्या आणि ते कधीही बॉम्ब टाकतील अशीही भीती विजयाशांतींना वाटते. अरेरे! बिचाऱ्या विजयाशांती. काय बरं झालं त्यांना? कारण माणसाला सारखी कशाची ना कशाची भीती वाटणे, जे नाहीय तेच आहे असे वाटणे, सारखं वाटणे की, कुणीतरी आपल्यावर बॉम्ब टाकेल? तर अशी बिनबुडाची भीती वाटणाऱ्या घाबरट माणसाला काय म्हणतात? कुणीही सांगेल की, ती व्यक्ती मानसिक रुग्णच असावी. विजयाशांतींनी ही अशी भीती कुठल्याही भीतीदायक वातावरणात, स्थळीकाळी व्यक्त केली नाही. तर त्या हे राजकीय पक्षाच्या बैठकीत बोलल्या. तिथे काँग्रेस पक्षाचे आलाकमान राजकुमार राहुल गांधीही होते. लोकशाही संकेतानुसार कायदा व्यवस्थेच्या सुरक्षित वातावरणात ती बैठक सुरू होती. लोकशाहीचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य वापरत विजयाशांती पंतप्रधानांच्या दिसण्याबाबत बोलत होत्या. त्यांच्या बोलण्यात भीती कमी आणि पंतप्रधानांची निंदा, अनाकलनीय हेवा, तिरस्कार होता. आलूपासून सोना बनविण्याची अगाध बुद्धी असलेल्या आपल्या शक्तिमान नेत्याला खुश करण्याचा बेरकी प्रयत्न होता. खरेतर आपल्या मनात जे असते तेच आपल्याला दिसते. डोळे बिचारे तर बघण्याची नुसती भूमिका निभावतात. विजयाशांती तरी काय करतील? त्यांना काँग्रेस पक्षात दिग्गी, सिद्धू, शशी थरूर आणि बरेच बरेच महानुभव भेटत असतील, शिवाय पक्षाध्यक्ष राहुल आहेतच. विजयाशांतींना या सर्वांचा अकल्पित शब्दातीत वैचारिक वारसा चालवायची इच्छा आहे, असे दिसते. बाकी विजयाशांतींनी ध्यानात घ्यावे की, कोण्या एका सिनेमाचे हिरो होते म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत. देशाने त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना पंतप्रधान बनवले. नेता बनवले. पण विजयाशांतींना हे कळणार नाही, कारण त्या केवळ आणि केवळ सुस्वरूप दाक्षिणात्य सिनेअभिनेत्री होत्या म्हणून त्या काँग्रेसच्या नेतेपदी आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat