नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारावरुन काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला घेरण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. राहुल गांधीदेखील दरवेळी नवनव्या पद्धतींनी जुन्याच आरोपांची राळ उडवून देत असल्याचे दिसते. काँग्रेसचे सर्वच दावे खोटारडे आणि भुसभूशीत पायावर आधारलेले असले तरी राहुल गांधी आरोप करतच राहतात. भाजप सरकारने मात्र आतापर्यंत प्रत्येकवेळी काँग्रेसने लावलेल्या खोट्या आरोपांना चव्हाट्यावर आणण्याचे काम केले. भाजपने शनिवारी पुन्हा एकदा आपल्या ट्विटर खात्यावरुन राफेलवरील काँग्रेसच्या खोट्या आरोपांवर मुद्द्यांच्या आधारे काँग्रेसचा आरोप आणि नंतर तथ्य अशा स्वरुपात थेट उत्तरे दिली आहेत. ती अशी-
काँग्रेसचा आरोप क्र. १ - राहुल गांधींनी फ्रेंच मीडिया अहवालाच्या हवाल्याने भारत सरकारने डसॉल्ट कंपनीवर अंबानींना ऑफसेट पार्टनर करण्यासाठी दबाव आणला.
भाजपचे उत्तर - भाजपने राहुल गांधींच्या या आरोपाला उत्तर देत, सर्वोच्च न्यायालय आणि डसॉल्ट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी स्वतः ऑफसेट पार्टनरच्या निवडीमध्ये भारत सरकारची कोणतीही भूमिका नसल्याचे सांगितले आहे.
काँग्रेसचा आरोप क्र. २ - राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या हवाल्याने देशात अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला की, राफेल व्यवहारात अनियमितता आढळून आली. अशा प्रकारे काँग्रेसने या प्रकरणी प्रपोगंडा करण्याचा प्रयत्न केला.
भाजपचे उत्तर - वरील आरोपाबाबत भाजपने म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या इशार्यावरुन न्यायालयात याचिका दाखल करणार्यांचे अर्ज फेटाळून लावले आणि भारत सरकारने काहीही चुकीचे केले नसल्याचे सांगितले.
काँग्रेसचा आरोप क्र. ३ - राहुल गांधींनी दावा केला की, संरक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्याला राफेल व्यवहाराविरोधात डिसेंट नोट प्रस्तुत केल्याबद्दल मोदी सरकारने शिक्षा दिली.
भाजपचे उत्तर - संरक्षण मंत्रालयातील अधिकार्याने स्वतःच याप्रकरणी माध्यमांसमोर येत मोदी सरकारने आपल्याला कोणतीही शिक्षा दिली नसल्याचे सांगितले. यावरुन राहुल गांधींचा बुरखा फाटल्याचे स्पष्ट दिसते.
काँग्रेसचा आरोप क्र. ४ - राहुल गांधींनी म्हटले होते की, फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलांद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हटले. कारण भारत सरकारने त्यांना रिलायन्स कंपनीला राफेल व्यवहारात सहभागी करुन घेण्याचा आग्रह केला.
भाजपचे उत्तर - भाजपने राहुल गांधींच्या या आरोपावर उत्तर देत म्हटले की, ओलांद यांनी राहुल आणि काँग्रेसच्या आरोपांना फेटाळून लावले आहे. इतकेच नव्हे तर फ्रान्स सरकारने अधिकृतरित्या निवेदन प्रसिद्धीस देऊन या मुद्द्यावर स्पष्टीकरणही दिले होते.
काँग्रेसचा आरोप क्र. ५ - राहुल गांधींनी संसदेत म्हटले होते की, फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी मला स्वतः सांगितले की, करारात कोणतेही गोपनीयतेचे कलम नाही.
भाजपचे उत्तर - फ्रान्स सरकारने राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर दिले आणि म्हटले की, करारात सहभागी असलेल्या सर्वच पक्षांना यासंबंधित कोणतीही माहिती सार्वजनिक करण्याची परवानगी नाही.
काँग्रेसचा आरोप क्र. ६ - राहुल गांधींनी संपुआ सरकारच्या दरम्यान झालेल्या राफेल व्यवहाराच्या किंमती सांगितल्या होत्या. संसदेत राहुल गांधींनी विमानांची किंमत ५२० कोटी सांगितली, तर कर्नाटकात ५२६ कोटी आणि राजस्थानात ५४० कोटी आणि दिल्लीमध्ये या व्यवहाराची किंमत ७०० कोटी सांगितली होती.
भाजपचे उत्तर - भाजपने या आरोपावर उत्तर देत म्हटले की, राहुल गांधींना खोटे बोलण्यासाठीचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे.
काँग्रेसचा आरोप क्र. ७ - राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने सैन्य अधिग्रहणाच्या नियमांचे आणि प्रक्रियांचे उल्लंघन केले आहे.
भाजपचे उत्तर - भाजपने या आरोपावर उत्तर देत स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, खरे म्हणजे राफेल खरेदी प्रक्रियेवर संशय घेण्याचे कोणतेही कारण नाही.
काँग्रेसचा आरोप क्र. ८ - राहुल गांधींनी आरोप केला की, संपुआने ५२६/५२०/५४० कोटींत हा व्यवहार केला तर रालोआ सरकार हा व्यवहार प्रति विमान १६०० कोटीत करत आहे.
भाजपचे उत्तर - राहुल गांधी सफरचंदाची तुलना संत्र्याशी करत आहेत. रालोआने निश्चित केलेली राफेल विमानांची किंमत संपूर्ण यंत्रसामग्री व शस्त्रास्त्रांसहित आहे.
काँग्रेसचा आरोप क्र. ९ - राहुल गांधींनी म्हटले की, ३६ विमान खरेदी करण्याचा निर्णय हवाईदलाचे नुकसान तर मित्रांना फायदा करुन देण्यासाठी केला आहे.
भाजपचे उत्तर - या प्रश्नावर भाजपने उत्तर दिले की, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, हा निर्णय सैन्यविषयक तयारीला लक्षात घेऊन घेण्यात आला आणि यामुले हवाईदल आनंदात आहे.
काँग्रेसचा आरोप क्र. १० - दि. ८ फेब्रुवारीला राहुल गांधींनी द हिंदू वृत्तपत्रात प्रकाशित अर्धवट फोटो आणि वृत्ताला आधारभूत मानून पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा प्रयास केला.
भाजपचे उत्तर - आम्हाला आधीपासूनच माहिती आहे की, काँग्रेस भाजप सरकारवर आरोप लावण्यासाठी फोटोशॉपने एडिट केलेल्या फोटोंची मदत घेत आहे. पण कोणी कितीही खोटे बोलले तर अखेर सत्याचाच विजय होतो.
अशा प्रकारे काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आणि भ्रम पसरवणार्या राजकारणावर भाजपने विराम लावला आहे. संरक्षणविषयक व्यवरांतील काही गोष्टी गोपनीय ठेवणे राष्ट्रहिताचे असते, पण काँग्रेस राष्ट्रहिताला बाजूला सारुन विनाकारण संभ्रमाचे धोरण अवलंबताना दिसते, जे देशासाठी योग्य नाही, असे म्हणता येते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/