‘मला माझ्या मर्यादेत राहू द्या !’ : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 

पंतप्रधानांचा विरोधकांना खरमरीत इशारा

 

नवी दिल्ली :खोट्या आरोपांची पत्रकार परिषद घेऊन तुम्ही देशाची अशी कोणती प्रतिष्ठा उंचावली? विरोधी पक्षांचे काम विरोध करणे, टीका करणे हे आहेच. परंतु, तुम्ही मोदी आणि भाजपवर टीका करता करता देशविरोधातही बोलू लागला आहात. देशविरोधी बोलणाऱ्यांची आम्ही कोणतीही दखल घेणार नाही,” असे सुनावत “मला माझ्या मर्यादेत राहू द्या, मी माझ्या मर्यादेत राहण्यातच तुमचे भले आहे,” असा खरमरीत इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिला.

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा सपाटून समाचार घेतला. काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकर्जुन खरगे यांच्या आरोपांचा उल्लेख करीत, मोदी म्हणाले की, “खरे बोलणारे बाहेरून आणि आतून एकच गोष्ट बोलत असतात. पंतप्रधान आणि राष्ट्रपती खरे बोलत आहेत, हे तर आता तुम्हाला मान्य करावेच लागेल. कारण, आतापर्यंत तुम्हाला खोटे ऐकण्याची सवय झाली होती.” पंतप्रधान मोदी घटनात्मक संस्थांना बरबाद करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. यावर हल्ला चढविताना मोदी म्हणाले की, “विरोधी पक्षांच्या या आरोपाने ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ या म्हणीची आठवण झाली. देशावर आणीबाणी लादली, ती काँग्रेसने. लष्कराचा अपमान केला, तो काँग्रेसने. लष्करप्रमुखाला गुंड म्हटले, ते काँग्रेसने. सरकार उलथवण्याबाबतचा बातम्या पसरविल्या, त्या काँग्रेसने आणि तरीसुद्धा तुम्ही म्हणता, मोदी देशातील घटनात्मक संस्थांना बरबाद करीत आहेत. आपल्या देशातील निवडणूक आयोग संपूर्ण जगात गौरवाचा आणि अभिमानाचा विषय आहे, छोट्या-मोठ्या तक्रारीनंतरही राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला मानत असतात. मात्र, तुम्ही आता निवडणुकीतील आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमवर फोडत आहात, तुम्ही इतके घाबरलेले का आहात, तुम्हाला काय झाले आहे, न्यायपालिकेला काँग्रेस धमकावत आहे, पहिले असे कधी झाले नव्हते. महाभियोगाच्या नावावर न्यायव्यवस्थेला हादरा देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आणि तुम्ही आमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहात.”

 

काँग्रेसच्या एका माजी पंतप्रधानाने योजना आयोगाला विदूषकांचा समूह म्हटले होते, याचे स्मरण करून देत, मोदी म्हणाले की, “घटनेतील ३५६ व्या कलमाचा सर्वाधिक दुरुपयोग काँग्रेसने केला आहे. निवडून आलेली विरोधी पक्षांची सरकारने काँग्रेसने बरखास्त केली. काँग्रेसच्या काळात ३५६ व्या कलमाचा दुरुपयोग शंभरवेळा झाला, त्यापैकी ५० वेळा इंदिरा गांधी यांनी त्याचा वापर केला. १९५९ मध्ये पं. नेहरू पंतप्रधान आणि इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना केरळचे सरकार बरखास्त करण्यात आले होते.” राहुल गांधी यांचे नाव न घेता, मोदी म्हणाले की, “मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे कागद पत्र परिषदेत फाडले जातात. त्यामुळे मोदींवर एक बोट ठेवताना, चार बोटे आपल्याकडे आहेत, याची जाणीव ठेवायला हवी.” पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात मल्लिकार्जुन खरगे यांचाही खरपूस समाचार घेतला. “खरगे अतिशय ‘डिसेंट’ (शालीन) व्यक्ती आहेत, मात्र माहीत नाही, त्यांची काय मजबुरी आहे, ‘हरबार डिसेंट, हरबार डिसेंट.’ एका गरीब माणसाने दिल्लीच्या सत्तेला आव्हान देणे, ही बाब काँग्रेसवाले अजूनही पचवू शकत नाही, त्यांच्या डोक्यातून ही बाब निघत नाही. सत्तेची ही नशा काँग्रेसला सोडवत नाही.” राफेल व्यवहारावर काँग्रेस करीत असलेल्या टीकेचा उल्लेख करीत मोदी म्हणाले की, “भारतीय वायू सेना सशक्त होऊ नये, अशी या पक्षाची इच्छा असल्याचा माझा गंभीर आरोप आहे. राफेलचा सौदा रद्द व्हावा, अशी तुमची इच्छा आहे. पण हा सौदा कोणत्या कंपनीसाठी रद्द करण्याची तुमची इच्छा आहे,” अशी विचारणाही मोदी यांनी केली. “राफेल व्यवहारावर करण्यात आलेल्या एकूण एक आरोपांची संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मुद्देसूद निराकरण केले आहे. कोणत्या लोकांसाठी देशाच्या सुरक्षेशी खेळत आहात. काँग्रेस पक्ष आणि सरकारने मलाई घेतल्याशिवाय देशातील एकही संरक्षण खरेदी व्यवहार होऊ दिला नाही, याचा इतिहास साक्षी आहे.” पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या सदस्यांनी केला.

 

आमच्या सरकारने सर्जिकल स्ट्राईक करताच, आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले होते, असे काँग्रेसचे नेते सांगू लागले. मात्र, तुमच्या काळात तर तुम्ही लष्कराला नि:शस्त्र करून टाकले होते आणि आता सर्जिकल स्ट्राईकच्या गोष्टी करीत आहात, तुमच्या कार्यकाळात लष्कराजवळ बुलेटप्रूफ जॅकेट, हेल्मेट, चांगले बूट आणि दळणवळणाची साधनेही नव्हती. २००९ मध्ये लष्कराने १.८६ लाख बुलेटप्रूफ जॅकेट्सची मागणी केली होती, पण २०१४ पर्यंत याची खरेदी झाली नव्हती. २०१६ आणि २०१८ मध्ये आम्ही लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट्स दिली. लष्कराच्या जवानांबद्दल काँग्रेसची वागणूक एवढी संवेदनाहिन का होती, याचे उत्तर काँग्रेसने दिले पाहिजे. सुदैवाने, त्यावेळी आमच्या शत्रूदेशाने काही केले नाही, अन्यथा आमची स्थिती काय राहिली असती, याची कल्पनाही करवत नाही.” विरोधी पक्षांच्या महाआघाडीवर मोदी यांनी सडकून हल्ला चढविला. “जेव्हा ‘महाभेसळ ’असलेले सरकार असते, तेव्हा देशाची अधोगती होते. देशवासीयांनी अनेकदा याचा अनुभव घेतला आहे. आमचे सरकार बहुमत असल्यामुळे ते देशवासीयांसाठी समर्पित आहे. काँग्रेस प्रत्येक निवडणुकांच्या वेळी एकच जाहीरमाना प्रसिद्ध करीत असतो. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेली वचने आमच्या सरकारने पूर्ण केली,” असा टोला मोदी यांनी हाणला. “तुमची ५५ वर्षे आणि माझे फक्त ५५ महिने. तेव्हा मोदींकडे बोट दाखविण्यापूर्वी आपला भूतकाळ तपासा,” असा टोला त्यांनी लगावला.

 

गांधीजींची इच्छा पूर्ण करीत आहोत

 

काँग्रेसमुक्त भारत ही तर गांधीजींची इच्छा होती, मी फक् त्यांचे स्वप्न पूर्ण करत आहे. तुम्ही काँग्रेसवाले जर गांधीजींचे भक्त असाल, तर त्यांची इच्छा पूर्ण करा, असे सांगताना, काँग्रेसमध्ये सामील होणे आत्महत्या करण्यासारखे आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, अशी आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@