मुंबई : "स्वातंत्र्यानंतर देशाची धर्माच्या आधारावर फाळणी करून मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी बहुसंख्य हिंदू असलेल्या हिंदुस्थानाला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित करणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. प्रत्येक देशात बहुसंख्य समाजाच्या भावनांचा प्राधान्याने विचार केला जातो; मात्र भारत हा जगातील एकमेव देश आहे, जेथे बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाच्या भावना पायदळी तुडवल्या जातात. हे असेच चालू रहाणार असेल, तर हिंदूंना त्यांच्या हक्काचे ‘हिंदु राष्ट्र’ जोरकसपणे मागावेच लागेल. यासाठीच इंग्रजांविरुद्ध क्रांतीचे बीज पेरणारे नरवीर उमाजी नाईक यांच्या बलीदानदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, दिनांक १० फेब्रुवारी रोजी या दिवशी संत ज्ञानेश्वर माऊली मैदान, संभाजीनगर, अशोकवन, दहिसर(पू.) या ठिकाणी सायंकाळी ५.३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे," अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते नरेंद्र सुर्वे यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी लष्कर-ए-हिंद चे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल, सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत उपस्थित होत्या.
नरेंद्र सुर्वे म्हणाले, ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत समितीच्या वतीने परळ, वडाळा, मुलुंड, भांडुप, घाटकोपर, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली, नेरूळ, कोपरखैरणे या ठिकाणी हिंदु राष्ट्र जागृती सभा झाल्या असून सहस्रावधी हिंदूंनी यांचा लाभ घेतला आहे. दहिसर येथे होणार्या या सभेचा हिंदु जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते जोरदारपणे या सभेचा प्रचार करत असून या भागांत ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या बैठका घेण्यात येत आहेत. या परिसरात सभेच्या निमंत्रणाची शेकडो हस्तपत्रके वितरण करण्यात आली असून मेगाफोनद्वारेही सभेची उद्घोषणा करण्यात येत आहे. या भागातील मंदिरांचे विश्वस्त, मंडळे, संघटना यांचे पदाधिकारी आणि सदस्य, लोकप्रतिनिधी यांच्या भेटी घेऊन त्यांना सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच घरोघरी जाऊन सभेचे निमंत्रण देण्यात येत आहे. ‘वॉट्स अप, ट्वीटर, फेसबूक‘, आदी सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे सभेचा प्रचार करण्यात आला असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. अधिकाधिक धर्मप्रेमी हिंदूंनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन मी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करत आहे. अधिक माहितीसाठी या ८०८०२०८९५८ या क्रमांकावर संपर्क करावा.
या वेळी ईश्वरप्रसाद खंडेलवाल म्हणाले, १९७८ मध्ये घटना दुरुस्ती करून घटनेत ‘सेक्युलर’ हा शब्द नव्याने घालण्यात आला आणि भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. ‘सेक्युलर’ सरकार हिंदूंची मंदिरे ताब्यात घेते आणि मंदिरातील धनाचा वापर अन्य धर्मियांच्या विकासासाठी खर्च करते. अन्य धर्मियांच्या यात्रांना सवलती दिल्या जातात आणि हिंदूंच्या यात्रांवर अतिरिक्त कर लादण्यात येतो. राज्यात गोहत्या बंदी कायदा असूनही गोहत्या थांबलेल्या नाहीत. हिंदु धर्म आणि हिंदू धर्मीय यांच्यावरील हे आघात रोखण्यासाठी आम्ही सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राची मागणी करत आहोत.
सभेच्या प्रचारासाठी वाहनफेरी
या हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या प्रचारासाठी ९ फेब्रुवारीला भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता काजूपाडा येथील साईबाबा मंदिर येथून या फेरीला प्रारंभ होणार आहे. ही फेरी सावरपाडा-नेन्सी वसाहत-शिववल्लभ मार्ग-विद्याभूषण शाळा-रावळपाडा चौक-कोकणीपाडा-एस्.एन्.दुबे मार्ग या मार्गाने जाणार असून रावळपाडा येथील वरदविनायक मंदिराच्या ठिकाणी फेरीची सांगता होईल, सर्व धर्मप्रेमी हिंदू बांधवांनी या फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन नरेंद्र सुर्वे यांनी या वेळी केले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/