जयपूर : राजस्थान येथे स्वाईन फ्लूने मोठा धुमाकूळ घातला आहे. मागील महिन्याभरात स्वाईन फ्लूमुळे तब्बल ८८ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये सगळ्यात जास्त २६ जणांचा मृत्यू एकट्या जोधपूरमध्ये झाला आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या धोक्याने राज्यातील ११ हजार ८११ जणांची तपासणी करण्यात आली असून यापैकी २ हजार ५२२ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. १ जानेवारी २०१९ ते ५ फेब्रुवारी २०१९ दरम्यानचे हे सरकारी आकडे आहेत.
स्वाईन फ्लूचा वाढता धोका लक्षात घेऊन राजस्थान सरकारने राज्यभरात व्यापक स्वरूपाची तपासणी मोहीम राबविली आहे. जयपुर, जोधपुर, उदयपुर, बीकानेर आणि अजमेर या जिल्ह्यांमधून या तपासणी मोहिमेची सुरुवात केली होती. ९ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान चालणार असून आतापर्यंत ९ लाख ५८ हजार ६०५ जणांची तपासणी केली आहे. ४ हजार ५५३ तपासणी टीमने २ लाख २५ हजार ३२७ घरात जाऊन ही तपासणी केली.
दरम्यान, स्वाईन फ्लूचा वाढता धोका लक्षात घेऊन दिल्ली सरकारनेदेखील हायअलर्ट जारी केले आहेत. स्वाईन फ्लू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/