मुंबई : रविवारचा दिवस हा मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. अवघ्या सात तासात झालेल्या विविध अपघातांमध्ये सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ठाणे-डोंबिवली-ऐरोली मार्गावर सकाळच्या वेळेत हे अपघात घडले. ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या व्यक्तीचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडलेला हा पहिला अपघात होता.
सकाळी आठ वाजताच्या सुमारास ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह ठाणे आणि ऐरोली स्थानकादरम्यान आढळला. लोकलच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. या घटनास्थळापासून काही मीटर अंतरावरच ९ वाजताच्या सुमारास २० वर्षीय राहुल चौहानचा मृतदेह आढळला. रुळावरुन ठाणे स्टेशनकडे चालत जाताना त्याला ट्रेनने उडवले.
घाटकोपरहून ठाणेमार्गे नालासोपाऱ्याला जाणाऱ्या ४४ वर्षीय अकेश पडयाल यांचाही मृत्यू झाला. ठाणे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर फलाट आणि रुळाच्यामध्ये त्यांचा मृतदेह सापडला. धावती लोकल पकडण्याच्या नादात त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. कोपरमध्ये २६ वर्षीय प्रिती राणे, त्यांचा दोन वर्षांचा मुलगा लिवेश आणि नातेवाईक सुनिता बांगले यांचाही मृत्यू झाला. रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेस ट्रेन आणि लोकल यांच्या मधोमध अडकल्यामुळे त्या जखमी झाल्या होत्या.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/