वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताने ३५ धावांनी मिळविला. या विजयासह भारताने ही मालिका ४-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९.५ षटकात सर्वबाद २५२ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात न्यूझीलंडने ४४.१ षटकात सर्वबाद २१७ धावा केल्या. यामध्ये अंबाती रायुडूने केलेली ९० धावांची खेळी आणि युझवेन्द्र चहलच्या ३ विकेटचा यामध्ये मोठा वाटा होता.
प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. रोहित-शिखर ही सलामीवीर जोडी स्वस्तात माघारी परतली. ४ बाद १८ अशी भारताची नाजूक स्थिती झाली होती. त्यानंतर अंबाती रायुडू आणि विजय शंकर यांनी भारतचा डाव सावरला. त्यांनी ९८ धावांची भागीदारी केली. विजयने ४५ धावा केल्या. तर अंबातीने ११३ चेंडूत ९० धावा केल्या. त्यात ४ षटकार आणि ८ चौकारांची आतषबाजी केली. हार्दिकने तुफानी हल्ला करत २२ चेंडूत झटपट ४५ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेनरीने ४ तर बोल्टने ३ विकेट्स घेतल्या.
२५३ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. मोहम्मद शमीने हेनरी निकोल्स याला बाद करत पहिला धक्का दिला. कॉलिनने २४ धावा तर केन ३९, रॉस १, टॉम ३७ धावा काढून बाद झाले. मॅटने शेवटच्या टप्प्यात पंड्याच्या गोलंदाजीवर २ षटकार मारुन भारतीय संघाच्या मनात धडकी भरवली. भुवनेश्वर कुमारने बोल्टला बाद करत न्यूझीलंडचा डाव संपुष्टात आणला. हा सामना भारताने ३५ जिंकत मालिका ४-१ अशी खिशात घातली. भारताकडून शमी, पंड्याने प्रत्येक २ तर चहलने ३ आणि केदारने १ विकेट्स काढल्या.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/